
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचं सुखोई लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झालं असून, विमानाच्या पायलटचा शोध अजूनही सुरू आहे. शोध मोहिमेदरम्यान टीमला विमानाचा एक भाग सापडला आहे. मात्र, हा भाग पूर्णपणे जळून खाक झालेल्या अवस्थेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी ७ वाजून ४२ मिनिटांनी आसामच्या जोरहाटमधून या विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला होता.
या विमानाच्या बाबतीत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे, असं हवाई दलाने स्पष्ट केलं आहे. सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानाचा रडारशी संपर्क तुटल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली होती.
विमानाशी संपर्क तुटल्याची माहिती मिळताच गुवाहाटीच्या संरक्षण पीआरओने शोधमोहीम सुरू केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर हवाई दलाने स्वतः शोधकार्य हाती घेतलं. आसामच्या ग्रामीण भागातील डोंगराळ परिसरातून मोठा आवाज ऐकू आला आणि धूर निघताना दिसला, असं तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं. आसामच्या कार्बी आंगलाँग परिसरात तपास करत असताना विमानाचा हा जळालेला भाग सापडला.