
छत्तीसगडमधील बिलासपूरजवळ शुक्रवारी पहाटे एका भीषण रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रायपूर-रतनपूर हायवेवर साक्री पोलीस स्टेशन हद्दीतील संबलपुरी गावाजवळ पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका भरधाव ट्रेलरवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. तो रस्ता ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनवर गेला आणि समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ एसयूव्हीला त्याने जोरदार धडक दिली.
जवळच्या एका धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताच्या आधीची दृश्यं कैद झाली आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की रस्त्याच्या कडेला अनेक मोठी वाहनं उभी होती. एक पिकअप ट्रक डाव्या लेनमध्ये हॅझार्ड इंडिकेटर लावून उभा होता.
या उभ्या असलेल्या पिकअप आणि एका लांब ट्रेलरच्या मधून एक डंपर रस्ता ओलांडून गेला. या डंपरला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रेलर चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे हा मोठा ट्रेलर दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसला.
स्कॉर्पिओ चालकाला विचार करायला किंवा गाडी बाजूला घ्यायला दोन सेकंदांपेक्षाही कमी वेळ मिळाला, असं पोलिसांनी सांगितलं.
ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओला धडक दिल्यानंतर ट्रेलर दुसऱ्या एका उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकला आणि उलटला. या अपघातात स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यात बसलेले पाचही जण आत अडकले.
पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं. बचाव पथकाने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गॅस कटरच्या मदतीने गाडीचा पत्रा कापून सर्वांना बाहेर काढलं. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एकाला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात यश आलं.
पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे. यात छत्रपाल रात्रे (३७), विशाल लहरे (२५), अनमोल लहरे (१४) आणि सोनू मिरी (२८) यांचा समावेश आहे. जखमी प्रकाश रात्रे यांच्यावर छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत.
हे सर्व जण जवळच्या एका धाब्यावर लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून घरी परतत असताना हा अपघात घडला.
ट्रेलर चालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा ट्रेलर रायपूरच्या दिशेने जात असताना त्यावरील नियंत्रण सुटलं.
रस्त्याची स्थिती आणि चालकाची कृती यासह सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत, जेणेकरून अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल.
या अपघातामुळे रात्रीच्या वेळी हायवेवर अवजड वाहनांची वाहतूक आणि त्यांच्या पार्किंगच्या पद्धतींबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना सुरक्षेचे नियम पाळण्याचं आणि वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं आहे.