
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील विविध निर्णयांची माहिती दिली. गुरुकुंज मोजरी संस्थेसाठी नागपुरातील जागेच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काटोल येथे हॉर्टिकल्चर कॉलेज स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मावळ येथे NDRF केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचीही त्यांनी माहिती दिली. दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, आंदोलनात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी आणि आंदोलनामागील कथित षड्यंत्रकारी यांच्यात फरक केला पाहिजे. आंदोलनस्थळी दगडांनी भरलेले ट्रक कसे आले, त्यामागे कोण होते आणि त्यांचा उद्देश काय होता, याची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा संदर्भही त्यांनी याच पार्श्वभूमीवर असल्याचे सांगितले. याशिवाय बोगस बियाणे प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई, शेतकऱ्यांना मदत, दुबार पेरणीसाठी निधी तसेच महाबीजविरोधातही कारवाईच्या सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली. कर्जमाफीची पहिली यादी लवकरच जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.