Ram Mandir : देणगी घोटाळ्यावरून अयोध्येतील संत आक्रमक, CBI चौकशीची मागणी, प्रशासनाला सुनावलं

Published : Aug 25, 2026, 04:05 PM IST
Ram Mandir : देणगी घोटाळ्यावरून अयोध्येतील संत आक्रमक, CBI चौकशीची मागणी, प्रशासनाला सुनावलं

सार

Ram Mandir Donation : अयोध्येतील संतांनी राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावर चर्चा करण्यासाठी बोलावलेली बैठक प्रशासनाने थांबवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी स्थानिक प्रशासनावर जोरदार टीका केली असून, या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अयोध्या : अयोध्येतील अनेक संतांनी आरोप केला आहे की, राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावर चर्चा करण्यासाठी बोलावलेली त्यांची बैठक प्रशासनाने थांबवली. त्यांनी स्थानिक प्रशासनावर ताशेरे ओढत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

संतांचा जनआंदोलनाचा इशारा

महामंडलेश्वर प्रकाशानंद गिरी यांनी मंगळवारी राम मंदिर देणगी घोटाळ्यावरून अयोध्या प्रशासनाला धारेवर धरलं. सीबीआय चौकशीची मागणी मान्य न झाल्यास मोठं जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. या आरोपांनंतर महिनाभरापूर्वी ट्रस्टच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देणाऱ्या चंपत राय यांच्यावरही त्यांनी टीका केली.

अयोध्येत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "आम्हाला मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं होतं, पण आम्हाला थांबवण्यात आलं. आम्ही आधीच सांगितलं होतं की हे आंदोलन किंवा रॅली नाही. चोरांना पकडण्यासाठी प्रशासनाने अशीच तत्परता दाखवली असती, तर आम्हाला इथे येण्याची गरजच पडली नसती. एवढी मोठी रक्कम कोणीतरी घेऊन गेलं आणि यांना काहीच कळलं नाही? प्रशासन झोपलं होतं का? आम्ही शांततेत बैठक बोलावली होती, पण गेट बंद करण्यात आले. योगीजी आमच्यापैकीच एक आहेत, ते संत आहेत, पण हा स्थानिक प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे."

ते पुढे म्हणाले, "आम्हाला सीबीआय चौकशी हवी आहे, नाहीतर आम्ही मोठं जनआंदोलन करू. दिल्लीत आम्ही आंदोलन केलं तेव्हा आम्हाला बोलावून आमचं निवेदन स्वीकारण्यात आलं होतं. इथे आम्हाला परवानगी दिली जात नाहीये, कारण सत्य बाहेर आलं तर प्रशासनातील लोकही अडकतील. चंपत राय परत आले तर सरकार पडेल."

या प्रकरणी आठ जणांना अटक

या देणगी घोटाळ्यात मंदिरातील कर्मचारी आणि बँक कर्मचाऱ्यांनी पद्धतशीरपणे देणगीची चोरी केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणामुळे विरोधी पक्षांनीही मोठ्या स्तरावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अविनाश शुक्ला, अंकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रामा शंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि रामा शंकर उर्फ टिंकू अशा आठ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

UK Return : यूकेमधून ४ वर्षांनी परत आली, पण कारण काय? तरुणीची व्हायरल पोस्ट सांगतेय सगळं काही
Carbosulfan किटकनाशक होणार बॅन? आरोग्यासाठी मोठा धोका असल्याचा सरकारचा इशारा