
नवी दिल्ली : यूकेमध्ये चार वर्षं राहिल्यानंतर भारतात परत आलेल्या एका तरुणीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अर्शिया महाजन असं या तरुणीचं नाव असून, तिने बंगळूरमध्ये नवीन नोकरी सुरू केली आहे. तिने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करून आपला अनुभव सांगितला आहे. परदेशात राहणं हे काही तिचं स्वप्न नव्हतं, पण मिळालेल्या संधीबद्दल ती कृतज्ञ आहे, असं ती म्हणते. यूकेमधील आयुष्यामुळे तिला एक नवीन आयुष्य घडवता आलं, जगभरातील लोकांशी ओळख झाली, ती जास्त स्वतंत्र झाली आणि प्रोफेशनल म्हणूनही तिची वाढ झाली. पण हळूहळू हेच आयुष्य तिला एक ओझं वाटू लागलं.
तिने सांगितलं की, शेवटचे आठ महिने तर फक्त व्हिसाची प्रक्रिया, घराच्या भाड्याचं टेन्शन, इमिग्रेशनचे नियम आणि मित्र-मैत्रिणी सोडून जातील याची चिंता, यातच गेले. महिन्याचा पगार आला की तो लगेच खर्च व्हायचा. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत असतानाही अनेकदा तिला कुटुंबाकडून आर्थिक मदत घ्यावी लागली. यामुळे तिला प्रचंड मानसिक ताण आला होता. आपलं सगळं आयुष्य फक्त मूलभूत गरजा पूर्ण करण्यातच जातंय, असं तिला जाणवू लागलं.
After 4 years, I’ve moved back from the UK to India and started a new job in Bangalore.
Wouldn’t say it was 100% the happiest decision I’ve ever made.
But it felt like the right one for my nervous system.
A few things I’ve been thinking about since making the move 👇— Arshiya Mahajan (@ArshiyaMahajan3) ऑगस्ट २४, २०२६
यानंतर, 'हे सगळं खरंच गरजेचं आहे का?' असा प्रश्न तिला पडला, असं अर्शियाने लिहिलं आहे. अखेर आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून तिने आपल्या देशात परतण्याचा निर्णय घेतला. यूकेमधील वास्तव्य हे अपयश नव्हतं, तर त्यातून जे काही शिकायचं होतं ते मिळाल्यामुळेच मी परत येऊ शकले, असं अर्शियाने स्पष्ट केलं. ती पुढे म्हणते की, प्रत्येक चांगला निर्णय लगेचच आनंद देतो असं नाही. परदेशात राहताना येणारा एकटेपणा, आर्थिक ताण आणि व्हिसाची चिंता यावर उघडपणे बोललं पाहिजे. तिच्या या पोस्टवर अनेक परदेशस्थ भारतीयांनी कमेंट करून आपले अनुभव शेअर केले आहेत.