आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सुरू होण्याआधीच जपानच्या नागोयामध्ये भारतीय खेळाडूंना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागलाय. नवी दिल्लीतून मोठ्या उत्साहात रवाना झालेल्या या खेळाडूंचं जपानमध्ये मात्र भोंगळ कारभाराने स्वागत झालं.
भारताने 35 खेळांसाठी 503 जणांचं पथक (269 पुरुष आणि 234 महिला) जपानला पाठवलंय. भारताचे पुरुष आणि महिला क्रिकेट संघ जपानमध्ये स्वतंत्रपणे पोहोचणार आहेत. त्यांच्यासाठी आयोजकांनी आधीच खास व्यवस्था केली असल्याने त्यांना या तात्पुरत्या निवासाच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही.
पण नागोयामध्ये पोहोचलेल्या इतर भारतीय खेळाडूंचा मात्र चांगलाच हिरमोड झाला. यावेळी खेळाडूंसाठी एकच 'अॅथलीट्स व्हिलेज' बनवण्याऐवजी वेगवेगळ्या हॉटेल्स आणि 'कोस्टा सेरेना' क्रूझवर राहण्याची व्यवस्था करण्यात आलीय. यामुळे कागदपत्रांचा गोंधळ उडाला आणि खेळाडूंना त्यांच्या रूम्स मिळेपर्यंत तासन् तास ट्रान्झिट हबवरच ताटकळत राहावं लागलं.
नवी दिल्ली ते नागोया हा प्रवास तसा 12 तासांपेक्षा जास्त वेळेचा होता. पण जपानमध्ये पोहोचल्यावरही खेळाडूंचा मनस्ताप संपला नाही. बुधवारी रात्री उशिरापर्यंत अनेक भारतीय खेळाडू रूम मिळण्याची वाट पाहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, राहण्याच्या यादीत नावच नसल्याने भारत आणि थायलंडच्या खेळाडूंना चेक-इन करता आलं नाही. त्यामुळे त्यांना तासन् तास सामानासह तिथेच थांबावं लागलं. सोशल मीडियावर, विशेषतः एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) या दोन्ही देशांच्या खेळाडूंचा सामानासोबत वाट पाहत असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.
रूमची व्यवस्था होईपर्यंत काही खेळाडूंना चक्क विमानतळाच्या जमिनीवरच बसावं किंवा झोपावं लागलं. भारतीय खेळाडू पोहोचण्याआधीच तिथे राहण्याच्या व्यवस्थेवरून मोठा गोंधळ सुरू होता. अपुऱ्या आणि गैरसोयीच्या तात्पुरत्या रूम्समुळे अनेक देशांनी आयोजकांकडे आधीच तक्रारी केल्या होत्या.
🚨 INDIAN ATHLETES LEFT STRANDED IN NAGOYA DURING ASIAN GAMES! 🇮🇳🇯🇵
Indian athletes reportedly waited for more than 14 hours for accommodation after arriving in Nagoya for the Asian Games.
Athletes from Vietnam, China, South Korea and Thailand were also reportedly a
Credits -…— The Khel India (@TheKhelIndia) September 17, 2026
सुमारे 14 तासांच्या प्रतीक्षेनंतर काही भारतीय खेळाडूंना रूम्स मिळाल्या. पण गोंधळ इतका होता की अनेकांना रूम शेअर कराव्या लागल्या, तर काहींना तात्पुरतं दुसऱ्या हॉटेल्समध्ये हलवण्यात आलं.
आयोजकांनी या तक्रारी सोडवण्याचं आश्वासन दिलं असलं तरी, स्पर्धा सुरू होण्याआधीच या भोंगळ कारभारामुळे खेळाडू आणि अधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.
दुसरीकडे, 30 जणांच्या भारतीय नेमबाजी पथकालाही या गैरसोयीचा मोठा फटका बसला. त्यांची राहण्याची व्यवस्था शूटिंग रेंजपासून तब्बल 50 किलोमीटर दूर करण्यात आलीय. यामुळे प्रवासातच त्यांचा खूप वेळ जातोय.
टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, भारतीय नेमबाजी संघ सकाळी 9 वाजता जपानमध्ये पोहोचला. पण त्यांना रूम मिळवण्यासाठी पहाटे 2 वाजेपर्यंत वाट पाहावी लागली. या पडताळणी केंद्रावर त्यांना साधं अन्न किंवा पाणीही देण्यात आलं नाही.
हॉटेलमध्ये पुरेशा रूम्स नसल्याने भारतीय नेमबाजांना दोन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये विभागण्यात आलं. संपूर्ण संघासाठी जागा मिळवताना अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आणि यात आणखी वेळ गेला.
🚨 NIGHTMARE ARRIVAL FOR INDIAN SHOOTERS IN JAPAN 🇮🇳🇯🇵
India’s shooting contingent reportedly faced severe accommodation issues upon arriving for the Aichi-Nagoya Asian Games.
As per reports, the team landed at 9 AM but had to wait until 2 AM at the accommodation verification… pic.twitter.com/4Q3DW54XHr— The Khel India (@TheKhelIndia) September 17, 2026
आशियाई क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'अॅथलीट्स व्हिलेज' बनवण्यात आलेलं नाही. त्याऐवजी आयोजकांनी खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी हॉटेल्स, कंटेनरसारख्या तात्पुरत्या रूम्स आणि 'कोस्टा सेरेना' क्रूझवर राहण्याची व्यवस्था केलीय.
थोडक्यात सांगायचं तर, 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होण्याआधीच खेळाडूंच्या संयमाची परीक्षा घेत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचा आयोजकांचा हा प्रयोग पूर्णपणे फसला असून, आता ते या चुका सुधारण्यासाठी धावपळ करत आहेत.