
Andhra Pradesh Earthquake Tremors Felt : आंध्र प्रदेशात पहाटेच्या वेळी मध्यम स्वरुपाचा भूकंप झाला. अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.7 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर असल्याचे सिस्मॉलॉजी सेंटरने जाहीर केले.
या भूकंपाचा प्रभाव विशाखापट्टणममध्ये स्पष्टपणे जाणवला. आज पहाटे 4 वाजून 19 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. गाजुवाका, मधुरावाडा, ऋषिकोंडा, महाराणीपेटा, अक्कय्यापालेम, कैलासपुरम या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. लोक झोपेत असतानाच भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे घाबरलेले लोक झोपेतून उठून घराबाहेर धावले. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.
अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात झालेल्या भूकंपाचे धक्के आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांसह तेलंगणापर्यंत जाणवले. म्हणजेच त्याचा प्रभाव या भागांवर होता. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, गुंटूर २९६ किमी, वारंगल ३१५ किमी, नलगोंडा ३६७ किमी, करीमनगर ३६७ किमी, आणि बेरहामपूर (ओडिशा) २७४ किमी पर्यंत भूकंपाचा प्रभाव जाणवला.
मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. विशाखापट्टणम परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. याची तीव्रता अत्यंत कमी होती. त्यामुळे काही लोकांना तो भूकंप होता हेही समजले नाही. परंतु, आंध्र प्रदेशात याची तीव्रता जाणवली. लोक घराबाहेर पडले. त्यांना धरणी थरथरत असल्याचा अनुभव आला.