
Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. रायवरमजवळ खासगी बस आणि खडीने भरलेल्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर काही मिनिटांतच दोन्ही वाहनांना आग लागली आणि 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुमारे 20 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर लगेचच मोठा स्फोटसदृश आवाज झाला आणि बस व ट्रकने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की काही प्रवासी बाहेर पडण्याआधीच आगीच्या विळख्यात सापडले. दोन्ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली असून मृतदेहांची ओळख पटवणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुमारे 18 जखमी प्रवाशांना बाहेर काढून मार्कापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
ही बस तेलंगणातील जगित्यालहून कालिगिरीकडे जात होती. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात आहेत. काही मृतदेह अजूनही बसमध्ये अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच एन. चंद्रबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य वेगाने राबवण्याचे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे.