
Aisa Cup 2025 Final : पाकिस्तानने गुरुवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशवर ११ धावांनी निसटता विजय मिळवला आणि आशिया कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना रविवारी रंगणार आहे. याआधी या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांमुळे वाद निर्माण झाले होते.
सूर्यकुमार यादवने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याच्याशी नाणेफेक झाल्यानंतर हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. तसेच सामन्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवला नव्हता. यावरून पाकिस्तान चांगलाच भडकला आणि त्यांनी आयसीसीकडे औपचारिक तक्रार केली. याशिवाय सूर्यकुमार यादवच्या पहलागाम दहशतवादी हल्ल्यावरील श्रद्धांजली वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) समितीने या घटनेवर चौकशी केली. माजी क्रिकेटपटू आणि मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी बीसीसीआय प्रतिनिधींसह यादवची चौकशी केली. चौकशीनंतर यादवला ताकीद देण्यात आली असून त्याच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, ही कारवाई मानधन कपात किंवा डिमेरिट पॉईंट्सपुरती मर्यादित असेल. त्यामुळे फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार नसल्याची भीती निराधार ठरली आहे.
१४ सप्टेंबरला झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलागाम दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली होती. त्याने हा विजय भारतीय सैन्याला समर्पित केल्याचे सांगितले. त्याच्या या वक्तव्यावरून पाकिस्तानने आक्षेप घेतला होता आणि आयसीसीला तक्रार केली होती.