
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. मराठी शिकवण्याच्या अभियानाला चालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र काही चालकांना अद्याप मराठी शिकता आलेली नाही. 12 ऑगस्टच्या जीआरनंतर एका महिन्यात मराठी शिकण्याची अट आणि त्यानंतर परवाना, बॅज, परमिट तसेच दंडात्मक कारवाईच्या भीतीमुळे चालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा दबावाने नव्हे तर प्रेमाने शिकवली पाहिजे, अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका असल्याचे निरुपम म्हणाले. महाराष्ट्रात मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा सन्मान राखला पाहिजे आणि उर्वरित चालकांनीही कामचलाऊ मराठी शिकावी, असे त्यांनी सांगितले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नाराजीच्या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगत, मराठीचा सन्मानही कायम राहावा आणि गरीब चालकांचा रोजगारही हिरावला जाऊ नये, असा मध्यममार्ग आवश्यक असल्याचे निरुपम म्हणाले. नेपाळमधील आपत्तीवरही निरुपम यांनी भाष्य केले. या आपत्तीत भारतीय आणि महाराष्ट्रातील यात्रेकरूही अडकल्याचे सांगत शिवसेनेकडून मदतीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. हिमनद्या आणि नैसर्गिक व्यवस्थेत मानवी हस्तक्षेपामुळे अशा आपत्तींचा धोका वाढू शकतो, असा दावा करत विकास करताना निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.