
Dhurandhar Controversy : बॉलिवूड सिनेमा 'धुरंधर: द रिव्हेंज'वरून वाद चांगलाच पेटला आहे. आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी या सिनेमावर थेट हल्लाबोल केलाय. त्यांनी या सिनेमाला 'प्रोपेगंडा' म्हटलं आहे. असे सिनेमे समाजात द्वेष पसरवण्याचं काम करतात, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, असं पठाण म्हणाले. याआधी रम्या स्पंदना, प्रकाश राज आणि युट्यूबर ध्रुव राठी यांनीही सिनेमावर टीका केली होती. या सिनेमात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे.
मुंबईत ANI शी बोलताना वारिस पठाण म्हणाले, “मी असे फालतू, प्रोपेगंडा सिनेमे बघत नाही जे फक्त खोटं पसरवतात. काही स्वस्त लोक आहेत, जे थोडे पैसे कमावण्यासाठी द्वेष आणि खोटेपणा पसरवतात. त्यांना दुसरं काही बनवता येत नाही. हे लोक नोटाबंदीसारख्या खऱ्या मुद्द्यांचा वापर करतात, पण खरं काय आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे की लोक रांगेत उभे होते.”
पठाण पुढे म्हणाले, "असे सिनेमे मुस्लिमांना व्हिलन दाखवून करोडोंची कमाई करत आहेत. सिनेमे मनोरंजनासाठी बनवा किंवा खरा इतिहास दाखवा. लोकांना खूश करण्यासाठी चित्रपट बनवा, द्वेष पसरवण्यासाठी नाही. सरकारने अशा सिनेमांवर बंदी घातली पाहिजे. एप्सटीन फाईल्ससारख्या विषयांवर सिनेमे बनवा. जर पाकिस्तानच्या विरोधात सिनेमा बनवला असेल, तर तो तिथे जाऊन दाखवा, इथलं वातावरण का खराब करत आहात?"
'धुरंधर: द रिव्हेंज'चं लेखन आणि दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलं आहे. हा सिनेमा २०२५ मध्ये आलेल्या हिट 'धुरंधर' सिनेमाचा सीक्वेल आहे. यात एक भारतीय गुप्तहेर पाकिस्तानात जाऊन दहशतवादी संघटनेला संपवतो. सिनेमात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन यांच्यासारखे अनेक मोठे स्टार्स आहेत. या सिनेमाने प्रदर्शनानंतर आतापर्यंत तीन दिवसांत भारतात जवळपास २२६.२७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचं ग्रॉस कलेक्शन जवळपास ३३० कोटी रुपये झालं आहे.