
Govinda and Sunita Ahuja Divorce Rumors : बॉलिवूडचा 'हिरो नंबर १' गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हे त्यांच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या लग्नाबद्दल आणि नात्यातील तणावाबद्दल सोशल मीडियावर सतत काही ना काही बोललं जातं. आता या सगळ्या प्रकरणावर त्यांची मुलगी टीना आहुजाने पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. आई-वडिलांबद्दल पसरणाऱ्या खोट्या बातम्या आणि गोष्टी फुगवून सांगितल्यामुळे आपल्याला त्रास होतो, असं टीनाने मान्य केलं आहे. पण, पब्लिक लाईफमध्ये अशा गोष्टींना सामोरं जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर राहावं लागतं, असंही ती म्हणाली.
फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत टीना आहुजा म्हणाली की, ती लहानपणापासूनच तिच्या आई-वडिलांबद्दल अशा अफवा आणि बातम्या पाहत आली आहे. ती म्हणाली, “मी लहान असल्यापासून हे सगळं बघतेय. प्रत्येक दशकात एक नवीन कहाणी समोर येते. आधी हे सगळं मासिकांमध्ये छापून यायचं, मग इंटरनेटवर येऊ लागलं आणि आता तर इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरही पोहोचलं आहे. मी पण एक माणूस आहे, त्यामुळे जेव्हा एखाद्या गोष्टीत तथ्य नसतं आणि ती उगाच वाढवून सांगितली जाते, तेव्हा त्रास होणं स्वाभाविक आहे.”
प्रत्येक अफवेवर प्रतिक्रिया देणं आपल्याला गरजेचं वाटत नाही, असंही टीनाने स्पष्ट केलं. तिच्या मते, "क्लिकबेटसाठी (बातमीकडे लक्ष वेधण्यासाठी) कोणत्याही छोट्या गोष्टीचा मोठा विषय बनवला जातो आणि त्यातून एक नवीनच कहाणी तयार केली जाते. याचा माझ्यावर परिणाम होत नाही असं नाही, मी काही संत नाही. त्रास होतोच, पण या इंडस्ट्रीत काम करण्यासाठी तुम्हाला मनाने खंबीर बनावं लागतं. जेव्हा तुम्हाला सत्य माहीत असतं आणि तुमच्या नात्याचा पाया मजबूत असतो, तेव्हा अशा गोष्टींचा आपल्या आरोग्यावर आणि मानसिक शांततेवर परिणाम होऊ न देणंच चांगलं असतं."
याआधी सुनीता आहुजा यांच्या एका मुलाखतीमुळेही मोठी खळबळ उडाली होती. एका चर्चेदरम्यान एका नावाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या होत्या, "मला हे नाव आवडत नाही. या नावाने माझ्यासाठी फक्त अडचणीच निर्माण होतात." त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले गेले आणि लोकांनी याला गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडायला सुरुवात केली.
या वाढत्या चर्चांवर गोविंदानेही आपली बाजू मांडली होती. तो म्हणाला होता, "माझ्या कोणत्याही सह-अभिनेत्रीने कधीही माझ्यावर चुकीच्या वागणुकीचा किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलल्याचा आरोप केलेला नाही. ज्या नावाचा उल्लेख होत आहे, मी त्या व्यक्तीचा आभारी आहे की त्यांनी कधीही कोणतीही वादग्रस्त गोष्ट न बोलता शांत राहणं पसंत केलं." गोविंदाच्या या स्पष्टीकरणानंतरही चर्चा काही थांबल्या नाहीत आणि आजही त्यांच्या नात्याबद्दल अशाच अफवा पसरत राहतात.