
मुंबई - बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी हे अनेकदा सोशल मीडियावरून त्यांच्या मनातील विचार चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या वयाने नव्हे तर त्याच्यातील उर्जेने होते. सुनील शेट्टींच्या मते, एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची खरी ओळख त्यांच्यातील उर्जा, शिस्त, शिकण्याची जिज्ञासा आणि कठीण प्रसंगी धीर दाखवण्याच्या क्षमतेवरून होते. त्यांच्या या विचारांचे चाहते कौतुक करत आहेत.
सुनील शेट्टी म्हणतात, 'आपण वयाने नव्हे तर उर्जेने जगायला हवे. हा विचार माझ्या मनात खोलवर रुजला आहे कारण तो केवळ लोकांनाच नव्हे तर व्यवसायालाही लागू होतो. तुम्ही ३० वर्षांचे असूनही थकलेले वाटू शकता किंवा ६५ वर्षांचे असूनही उत्साहाने भरलेले असू शकता. हेच तत्व कंपन्यांनाही लागू होते. मी काही स्टार्टअप्सना तिसऱ्या वर्षीच थकलेले पाहिले आहे आणि काही कौटुंबिक व्यवसायांना पन्नास वर्षांनंतरही उत्साहाने भरलेले पाहिले आहे. फरक वयाचा नसून उर्जेचा असतो. शिस्तीची उर्जा, जिज्ञासू राहण्याची उर्जा, शिकण्याची आणि पुढे जाण्याची भूक आणि कठीण प्रसंगी धीर दाखवण्याची उर्जा. एक तरुण व्यक्ती जो आपली चमक गमावून बसला आहे तो परिस्थिती काहीही असो वृद्ध वाटेल. तर जे अनुभवी लोक स्वतःला प्रत्येक परिस्थितीनुसार बदलतात ते नेहमीच तरुण राहतात. म्हणूनच मी कधीही विचारत नाही की एखादा व्यवसाय किती वर्षांचा आहे, तर मी हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो की तो किती जीवंत आहे.'
सुनील शेट्टी पुढे म्हणतात, 'गेल्या काही वर्षांपासून माना आणि आमची मुले मला हळू चालण्यास सांगत आहेत. अथियाच्या बाळंतपणानंतर तर आणखीनच. आणि खरे सांगायचे तर आज त्यांच्यासोबत राहणे मला पाच-दहा वर्षांपूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे वाटते. पण त्याचबरोबर, मला प्रेरित करणाऱ्या उर्जेला मी दुर्लक्ष करू शकत नाही. ती उर्जा मला नवीन संधींसाठी उत्साहित करते. मी अनेकदा मनाशी म्हणतो की, जोपर्यंत मी दररोज सकाळी त्या उर्जेने उठतो तोपर्यंत मला थांबणे चुकीचे वाटेल. कारण असे करणे म्हणजे देवाने मला दिलेल्या संधी वाया घालवण्यासारखे आहे. तो दिवस येईपर्यंत मी कृतज्ञ राहणार आहे आणि मी पुढे जात राहणार आहे. मी सर्वांना अधिक उर्जा मिळो अशीच कामना करतो.'
सुनील यांच्या या पोस्टनंतर चाहते त्यांचे कौतुक करत आहेत.