
मुंबई : बॉलिवूडच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन होऊन पाच महिने उलटल्यानंतर, त्यांनी गायलेलं शेवटचं गाणं आता रिलीज झालं आहे. विशेष म्हणजे, आशाजींच्या ९३ व्या वाढदिवसादिवशीच हे गाणं चाहत्यांसाठी सादर करण्यात आलं आहे. हे त्यांनी रेकॉर्ड केलेलं अखेरचं गाणं ठरलं आहे.
'ओम का हरी' या सिनेमाच्या टीमने हे गाणं रिलीज केलं आहे. 'ऐ मेरी जिंदगी' असं या गाण्याचं नाव असून ते युट्यूब आणि इतर सोशल मीडियावर उपलब्ध झालं आहे.
अभिनेता अंशुमन झा याच्या सिनेमासाठी आशा भोसले यांनी हे गाणं गायलं होतं. हे गाणं २०२३ मध्ये रेकॉर्ड करण्यात आलं होतं. त्यावेळी स्टुडिओत आल्यावर आशाजींनी अंशुमन झा आणि सिनेमाच्या टीमशी गप्पाही मारल्या होत्या. त्यांनी हे गाणं का स्वीकारलं, याबद्दलही माहिती दिली होती.
सिनेमाच्या टीमने 'ऐ मेरी जिंदगी' हे गाणं आशाजींनीच गावं अशी इच्छा व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी आधी गाण्याचा एक ट्रॅक तयार करून आशाजींकडे पाठवला. तो ट्रॅक ऐकताच क्षणी आशा भोसले यांनी गाण्यासाठी होकार दिला. त्यांना हे गाणं खूप आवडलं होतं. रेकॉर्डिंगच्या वेळीचा त्यांचा एक व्हिडिओही टीमने शेअर केला आहे, ज्यात त्या म्हणाल्या, "मला फोन आला की आम्ही एक गाणं पाठवत आहोत. मी ट्रॅक ऐकला आणि कोणताही दुसरा प्रश्न न विचारता गाणं स्वीकारलं. हे गाणं, याचं संगीत आणि शब्द खूपच सुंदर होते." राजीव सारंग यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
दुर्दैवाने, हेच त्यांचं शेवटचं गाणं ठरलं. यानंतर आशा भोसले यांनी कोणतंही गाणं रेकॉर्ड केलं नाही. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. उपचार सुरू असतानाच एप्रिल २०२६ मध्ये त्यांचं निधन झालं. आज त्यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. आशाजींचा हा शेवटचा स्वर ऐकून चाहते भावूक झाले आहेत आणि या सुमधुर गाण्याने त्यांचं मन जिंकून घेतलं आहे.