
सध्याच्या काळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना चंदननगर येथून समोर आली आहे. १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. यावेळी ती राहत असलेल्या रुमपार्टनरकडून होत असलेल्या त्रास आणि बदनामीमुळे तीन हा निर्णय घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
पायल किशोर राजगुरू असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. ती पुण्यात नर्सिंगचा कोर्स करत होती आणि विठ्ठलनगर येथील अरिहंत कॉम्प्लेक्समध्ये आपल्या रूम पार्टनरसोबत राहत होती. तिने ९ मार्च रोजी आत्महत्या केली असून आपल्या आत्महत्येला रूम पार्टनर जबाबदार असल्याचा उल्लेख चिट्ठीमध्ये केला आहे.
पायलच्या रूममध्ये राहणाऱ्या सबुरी काळे, शिवानी आजबले आणि दीपाली यांच्या कपाटातून पैसे, पर्स आणि मोबाईल चोरीला गेले होते. हा मोबाईल पायलनेच घेतल्याचा आरोप करत या तरुणींनी तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. या तिघी तिला ब्लॅकमेल करत होत्या आणि बदनामीमुळे तिने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आलं आहे. आता पुढील तपास पोलीस करत आहेत.