
नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका 17 वर्षांच्या होतकरू महिला क्रिकेटरने क्रिकेट टीममध्ये निवड न झाल्याने आत्महत्या केली. तिने भावासाठी एक भावनिक सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) सध्या आगामी देशांतर्गत सिझनसाठी आपल्या अंडर-19 पुरुष आणि महिला टीमची निवड करत आहे. यासाठी नागपूरमध्ये सिलेक्शन ट्रायल्स सुरू होत्या. राज्य टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी या ट्रायल्स खूप महत्त्वाच्या मानल्या जातात, त्यामुळे संपूर्ण विभागातून अनेक तरुण खेळाडू इथे आले होते. अदितीलाही या निवड प्रक्रियेतून राज्य संघात स्थान मिळण्याची आशा होती.
या टीममध्ये निवड होणं हे कोणत्याही क्रिकेटरच्या करिअरमधला एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे स्पर्धा खूप मोठी असते. ज्यांची निवड होत नाही, त्यांना प्रचंड निराश व्हायला होतं. या घटनेमुळे देशभरातील तरुण खेळाडूंना किती मोठ्या मानसिक दबावाला सामोरं जावं लागतं, हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
या मुलीचं नाव अदिती चौखंडे असं आहे. ती मूळची अकोल्याची असून नागपूरमध्ये आई आणि भावासोबत राहत होती. तिचे वडील अकोला जिल्ह्यात सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. तिचा मोठा भाऊ, प्रबळ, हा सुद्धा एक उदयोन्मुख क्रिकेटर आहे आणि दोघं एकत्रच ट्रेनिंग घेत होते.
अदितीने नुकतीच १२वीची परीक्षा पास केली होती. ती आणि तिचा भाऊ रोज कसून सराव करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलेक्शन ट्रायल्समधून घरी परतल्यानंतर अदितीने आईसोबत जेवण केलं आणि ती तिच्या रूममध्ये गेली.
रूममध्ये गेल्यानंतर अदितीने आत्महत्या केली. तिने तिचा भाऊ प्रबळसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात लिहिलं होतं:
“दादा, तू खूप छान खेळतोस. तू खूप मोठा होशील. आई-बाबांना अभिमान वाटेल असं काहीतरी कर. माझी निवड झाली नाही याचं मला खूप दुःख आहे.”
🚨 SHOCKING NEWS - DEATH OF YOUNG CRICKETER🚨
Young Cricketer’s Tragic Death Shocks Nation
A 17-year-old aspiring cricketer from Nagpur has tragically died after reportedly struggling with the disappointment of not being selected for a regional cricket team.
Aditi Moreshwar… pic.twitter.com/NQSP2UImhc— Sunil Gavaskar (@virender_swag) July 31, 2026
ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा अदितीचा भाऊ प्रबळ एका क्रिकेट मॅचसाठी शहराबाहेर गेला होता. घरी फक्त तिची आई होती. या दुर्दैवी घटनेमुळे व्यावसायिक खेळात करिअर करू पाहणाऱ्या तरुण खेळाडूंवर किती प्रचंड मानसिक दडपण असतं, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, नागपूर आयुक्तालयाच्या हद्दीतील बजाज नगर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
बजाज नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक चेतन चौहान यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात असं दिसतंय की अंडर-19 टीममधून वगळल्यामुळे आलेल्या नैराश्यातूनच तिने हे टोकाचं पाऊल उचललं. पोलीस तिचे मित्र आणि कुटुंबीयांचे जबाब नोंदवत आहेत.
“मोठ्या टीममध्ये निवड न झाल्याच्या निराशेतून पीडितेने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं दिसतंय,” असं चेतन चौहान यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं.
बजाज नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.