
America Pakistan Relations : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी राष्ट्रीय सभेत अफगाणिस्तानातील युद्ध आणि तालिबानच्या मुद्द्यावरून अमेरिकेवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानने इस्लामच्या रक्षणाच्या नावाखाली आणि अमेरिकेच्या पाठिंब्यासाठी अफगाणिस्तानातील संघर्षात सहभाग घेतला, मात्र त्यातून देशाला मोठे नुकसान सहन करावे लागले, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ख्वाजा आसिफ यांनी आपल्या भाषणात अमेरिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानचा वापर टिश्यू पेपर किंवा टॉयलेट पेपरसारखा करण्यात आला आणि नंतर फेकून देण्यात आले. १९९९ नंतर अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तान पुन्हा युद्धात सामील झाला आणि त्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागली, असे त्यांनी सांगितले.
अमेरिकेला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानने आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातही बदल केले होते, मात्र आजपर्यंत त्यात सुधारणा करण्यात आलेली नाही, अशी कबुली त्यांनी दिली. या निर्णयांसाठी माजी लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावरही त्यांनी टीका केली.
आसिफ यांनी स्पष्ट केले की १९८० च्या दशकात रशियाविरुद्ध झालेल्या संघर्षाला जिहाद म्हटले जात होते, पण प्रत्यक्षात तो जिहाद नव्हता. पाकिस्तानने अमेरिकेच्या दबावाखाली २००१ मध्ये तालिबानविरुद्ध भूमिका घेतली. “अमेरिका निघून गेली, पण त्याचे परिणाम आम्ही अजूनही भोगत आहोत,” असे ते म्हणाले.
या धोरणांमुळे पाकिस्तान इतरांच्या युद्धात प्यादे ठरला, असा आरोप करत आसिफ यांनी सांगितले की, त्या निर्णयांची भरपाई कधीही होऊ शकत नाही. मागील सरकारला अमेरिकन पाठिंब्याची गरज होती, म्हणून हे पाऊल उचलले गेले, मात्र तो मोठा राजकीय आणि धोरणात्मक चुकीचा निर्णय ठरला.