
मुंबई : मेटाचा बॉस मार्क झुकरबर्गने जेव्हा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) मध्ये अब्जावधी डॉलर्स गुंतवण्याची घोषणा केली, तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता की, एवढा पैसा तो परत कसा मिळवणार? पण आता याचं उत्तर समोर आलं आहे. ब्लूमबर्ग न्यूजच्या रिपोर्टनुसार, मेटाने AI मधील आपली मोठी गुंतवणूक एका नव्या कमाईच्या साधनात बदलण्याची तयारी केली आहे. 'मेटा कॉम्प्युट' नावाच्या या नव्या प्रोजेक्टमधून कंपनी आपल्याकडील अतिरिक्त AI क्षमता इतर मोठ्या कंपन्यांना भाड्याने देणार आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि ॲमेझॉनसारख्या कंपन्यांसाठी हे एक मोठं आव्हान ठरू शकतं. पण या नव्या खेळीचा पहिला परिणाम भारतात दिसणार आहे.
झुकरबर्गच्या या नव्या क्लाउड बिझनेसमुळे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यातील व्यावसायिक स्पर्धा एका नव्या लेव्हलवर पोहोचली आहे. आतापर्यंत भारतातील AI च्या शर्यतीत अदानी पुढे होते. ते गुगलसाठी मोठे सर्व्हर फार्म्स वेगाने उभारत होते. बंदरं, विमानतळं आणि पॉवर ग्रिड चालवणाऱ्या अदानी ग्रुपसाठी डेटा सेंटरच्या व्यवसायात उतरणं ही एक स्वाभाविक गोष्ट होती. पण आता त्यांचे हे प्लॅन्स थेट मुकेश अंबानींच्या ध्येयांशी टक्कर देत आहेत.
अदानी जिथे डिजिटल रिअल इस्टेटवर लक्ष केंद्रित करत आहेत, तिथे अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज सामान्य लोक आणि कंपन्यांसाठी AI सेवा देण्यावर जोर देत आहे. रिलायन्स आपल्या १० वर्ष जुन्या जिओ प्लॅटफॉर्म्सला एका पूर्ण टेक्नॉलॉजी कंपनीत बदलण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे, २०२० मध्ये मेटाने जिओमध्ये ९.९९% हिस्सेदारी विकत घेतली होती.
जनरेटिव्ह AI मुळे भारतातील पारंपरिक आयटी सर्व्हिसेसची पद्धतच बदलून गेली आहे. कमी पगारात काम करणारे आणि इंग्लिश बोलणारे तरुण ही आतापर्यंत भारताची ताकद होती. पण आता काळ बदलला आहे. आता कमी खर्चात सौर ऊर्जा आणि पवनचक्की वापरून AI टोकन तयार करणारे उद्योजक या क्षेत्रात पुढे असतील.
एकीकडे बंगळुरूत बसून मेटाचे इंजिनिअर्स स्वतःच्या सिलिकॉन चिप्स बनवत आहेत, तर दुसरीकडे पश्चिम किनाऱ्यावरील गुजरात या AI फॅक्टरींसाठी लागणारी ऊर्जा निर्माण करण्यात आघाडीवर आहे.
इथेच अदानींनी १०० अब्ज डॉलर्सच्या AI कॉम्प्युट प्रोजेक्टचा भाग म्हणून जगातला सर्वात मोठा रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट उभारला आहे. याला उत्तर म्हणून अंबानींनी तब्बल ५,५०,००० एकरमध्ये (म्हणजे सिंगापूरच्या तिप्पट मोठा) एक भव्य प्रोजेक्ट सुरू केला आहे. हा पूर्ण झाल्यावर जगात सर्वात कमी खर्चात २४ तास ग्रीन एनर्जी देणारं केंद्र बनेल, असा रिलायन्सचा दावा आहे.
गेल्या महिन्यात अंबानींनी गुजरातच्या जामनगरमध्ये १६८ मेगावाट क्षमतेचं डेटा सेंटर उभारण्यासाठी मेटासोबत भागीदारीची घोषणा केली. वरवर पाहता हा एक साधा भाडेकरार वाटत असला, तरी भारतीय कंपन्यांना यात 'डेटा सार्वभौमत्व' (Data Sovereignty) मिळत आहे, जे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
बँकिंग, विमा, टेलिकॉम, आरोग्य आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रात डेटा सुरक्षा हा एक मोठा मुद्दा आहे. ग्राहकांची महत्त्वाची माहिती ॲमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या अमेरिकन क्लाउडवर पाठवल्यास अनेकदा कठोर सरकारी तपासणीला सामोरं जावं लागतं. इथेच रिलायन्स-मेटाची पार्टनरशिप गेम चेंजर ठरते.
मुंबईतील एखादी बँक आपल्या ग्राहकांची कोणतीही माहिती देशाबाहेर न पाठवता, जामनगरमधील सर्व्हर वापरून AI च्या मदतीने कर्ज मंजुरीसारखी कामं सहज करू शकेल. यामुळे AI इंजिन आणि डेटा दोन्ही भारतीय हद्दीत सुरक्षित राहतील. हा प्रोजेक्ट सांभाळणाऱ्या 'रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्स लिमिटेड'मध्ये रिलायन्सची ७० टक्के आणि मेटाची ३० टक्के हिस्सेदारी आहे.
अंबानी किंवा अदानी यांना स्वतः पैसे खर्च करून AI मॉडेल्स तयार करण्यात सध्या रस नाही. हे खर्चिक काम त्यांनी सिलिकॉन व्हॅली आणि चीनवर सोडून दिलं आहे. AI च्या जगात स्वतः रॉकेट बनवण्यापेक्षा, ते लाँच करण्यासाठी 'लाँच पॅड' तयार करण्यात भारतीय कंपन्यांना जास्त रस आहे.
गुगलसोबत मजबूत भागीदारी असलेले अदानी आजही एक मोठी शक्ती आहेत. सौर आणि पवन ऊर्जेव्यतिरिक्त, नुकत्याच खासगी क्षेत्रासाठी खुल्या झालेल्या अणुऊर्जा क्षेत्रातही अदानींचे मोठे प्लॅन्स आहेत. यामुळे AI सर्व्हरला कमी खर्चात अखंड वीजपुरवठा करणं त्यांना शक्य होईल. तरीही, मेटा-रिलायन्सच्या भागीदारीने स्पर्धेची पातळी खूप उंचावली आहे.
झुकरबर्गसाठी, आपला क्लाउड बिझनेस यशस्वी करण्यासाठी भारत ही एक उत्तम प्रयोगशाळा आहे. तर अंबानींसाठी, मोठ्या पार्टनरशिप्स करण्यातली आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करण्याची ही एक संधी आहे.