
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये भविष्यासाठी एक मजबूत भागीदारी (forward-looking partnership) तयार करण्याच्या कार्नी यांच्या भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं. यानंतर पंतप्रधान मोदी आणि कार्नी यांची हैदराबाद हाऊसमध्ये भेट होणार आहे.
या भेटीनंतर जयशंकर यांनी 'X' (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट केली. 'आज सकाळी नवी दिल्लीत कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांची भेट घेऊन आनंद झाला. भविष्यासाठी एक चांगली भागीदारी तयार करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचं मी कौतुक करतो,' असं जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कॅनडाचे पंतप्रधान मुंबईचा यशस्वी दौरा संपवून रविवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीत दाखल झाले. हा त्यांच्या भारत दौऱ्याचा पुढचा टप्पा आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं.
रविवारी संध्याकाळी जयशंकर यांनी पंतप्रधान कार्नी यांच्या भेटीपूर्वी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांचीही भेट घेतली होती. 'आज संध्याकाळी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांचं नवी दिल्लीत स्वागत केलं. उद्या होणाऱ्या पंतप्रधानांच्या भेटीची उत्सुकता आहे,' असं जयशंकर यांनी 'X' वर दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं.
या भेटीनंतर अनिता आनंद यांनी जयशंकर यांचे आभार मानले. 'नवी दिल्लीतल्या या हर्षभरल्या स्वागतासाठी डॉ. एस. जयशंकर, तुमचे आभार. कॅनडा आणि भारत यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आणि पुढील महत्त्वाच्या कामांसाठी मी उत्सुक आहे,' असं आनंद यांनी 'X' वर पोस्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी २७ फेब्रुवारी ते २ मार्च या काळात भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान म्हणून कार्नी यांचा हा पहिलाच भारत दौरा असून, त्यांच्या दौऱ्याची सुरुवात २७ फेब्रुवारीला मुंबईतून झाली.
आज हैदराबाद हाऊसमध्ये होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही देशांचे पंतप्रधान 'भारत-कॅनडा सामरिक भागीदारी'चा (India-Canada Strategic Partnership) आढावा घेतील. याआधी जून २०२५ मध्ये कनानस्किस (G7 शिखर परिषद) आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये जोहान्सबर्ग (G20 शिखर परिषद) येथे दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. आजच्या बैठकीत व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, महत्त्वाची खनिजं, कृषी, शिक्षण, संशोधन आणि दोन्ही देशांतील नागरिकांचे संबंध यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, दोन्ही नेते प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा करतील. या औपचारिक चर्चेसोबतच पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कार्नी 'इंडिया-कॅनडा सीईओ फोरम'मध्येही (India-Canada CEOs Forum) सहभागी होणार आहेत.
भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सोमवारच्या चर्चेत दोन्ही देशांमधील महत्त्वाच्या सामरिक आणि आर्थिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं जाईल.