
Indian Citizen Killed in Riyadh Attack Amidst Regional Tensions रियाद: सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये झालेल्या एका हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. भारतीय दूतावासाने बुधवारी ही माहिती दिली. या घटनेमुळे, पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यापासून मृत्यू झालेल्या भारतीयांची संख्या आता सहावर पोहोचली आहे.
दुसरीकडे, कुवेतमधील मिना अल-अहमदी रिफायनरीवर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला झाला. कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे अनेक ड्रोनने रिफायनरीला लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे रिफायनरीच्या काही भागांमध्ये आग लागली. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून काही युनिट्स तात्पुरती बंद ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि UAE च्या आंतरराष्ट्रीय सहकार राज्यमंत्री रीम बिंत इब्राहिम अल हाशिमी यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. गुरुवारी दिल्लीत झालेल्या या भेटीत रीम अल हाशिमी यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांचीही भेट घेतली. या चर्चेत या भागातील सुरक्षेची आव्हानं आणि इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम हे मुख्य विषय होते. डॉ. एस. जयशंकर यांनी स्वतः 'X' अकाउंटवर या भेटीची माहिती दिली.
इराणकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याबद्दल दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली. होरमुझची सामुद्रधुनी हा जगातील महत्त्वाचा ऊर्जा पुरवठा मार्ग आहे. या मार्गावरील जहाजांची वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहण्याची गरज या चर्चेत अधोरेखित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय व्यापाराला पाठिंबा देण्यासाठी सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य जपले पाहिजे, अशी मागणी दोन्ही देशांनी केली.