
India Rushes Emergency Fuel Supply to Sri Lanka : मध्य पूर्वेतील संघर्षामुळे इंधन संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताने मोठा दिलासा दिला आहे. भारताने श्रीलंकेला ३८,००० मेट्रिक टन (MT) पेट्रोलियमचा पुरवठा केला आहे. कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०,००० मेट्रिक टन डिझेल आणि १८,००० मेट्रिक टन पेट्रोल घेऊन एक जहाज २८ मार्च रोजी कोलंबो बंदरावर पोहोचलं.
मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे श्रीलंकेच्या इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे श्रीलंकेने भारताकडे तातडीच्या मदतीसाठी विनंती केली होती. यानंतर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी २३ मार्च रोजी श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्याशी संवाद साधला.
इंधन मिळाल्यानंतर श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. "भारताच्या मदतीबद्दल धन्यवाद. ३८,००० मेट्रिक टन इंधनाचा साठा काल कोलंबोमध्ये पोहोचला. मी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचेही आभार मानतो," असं ते म्हणाले. श्रीलंकेतील विरोधी पक्ष 'समागी जन बलवेगय'चे नेते सजित प्रेमदासा यांनीही या तातडीच्या मदतीबद्दल भारताचे आभार मानले आहेत.