Colombia Plane Crash: ईशान्य कोलंबियामध्ये सतेना एअरलाइनचं एक छोटं विमान कोसळलं. कुकुटाहून ओकानाकडे जाणाऱ्या या विमानाचा टेक-ऑफनंतर काही मिनिटांतच ATC शी संपर्क तुटला. विमानात असलेल्या सर्व १५ जणांचा मृत्यू झाला.
Colombia Plane Crash News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला २४ तास उलटत नाहीत तोच आणखी एक छोटे विमान कोसळले. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना ईशान्य कोलंबियामध्ये घडली. जिथे एक छोटे प्रवासी विमान कोसळले आणि त्यातील सर्व १५ जणांचा मृत्यू झाला.
26
विमान कुठून उडाले आणि कुठे जात होते?
मिळालेल्या माहितीनुसार, HK4709 क्रमांकाचे हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:४२ वाजता कुकुटा शहरातून निघाले होते. विमानाला ओकाना येथे पोहोचायचे होते, जे एक डोंगराळ शहर आहे आणि हवाई मार्गाने सुमारे ४० मिनिटांच्या अंतरावर आहे. हा अपघात कोलंबियाच्या नॉर्टे डी सँटेंडर प्रांतातील ग्रामीण भागात झाला. हे विमान सरकारी एअरलाइन सतेना (Satena) द्वारे चालवले जात होते. विमानाने उड्डाण करताच, हा प्रवास शेवटचा ठरेल याची कोणालाच कल्पना नव्हती.
36
उड्डाणानंतर काही मिनिटांतच काय बिघाड झाला?
सतेना एअरलाइनच्या निवेदनानुसार, टेक-ऑफनंतर काही मिनिटांतच विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क तुटला. त्यानंतर विमानाकडून कोणताही संदेश मिळाला नाही. याच क्षणी काहीतरी अघटित घडल्याची भीती वाढू लागली.
थोड्या वेळाने, कुरासिका गावातील स्थानिक लोकांनी आणि अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात विमानाचे अवशेष पाहिले. त्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच बचाव पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आले, पण जेव्हा पथक तिथे पोहोचले, तेव्हा परिस्थिती अत्यंत भीषण होती. अधिकाऱ्यांनी विमानात असलेल्या सर्व १५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. यामध्ये १३ प्रवासी आणि २ क्रू सदस्यांचा समावेश होता. बचाव पथकाला कोणीही जिवंत आढळले नाही.
56
विमानात कोण-कोण होते?
या अपघातात एक महत्त्वाचे नावही समोर आले आहे. विमानात डायोजेनेस क्विंटरो हे देखील होते, जे कोलंबियाच्या अंतर्गत सशस्त्र संघर्षातील पीडितांचे स्थानिक प्रतिनिधी असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मृत्यूमुळे अनेक सामाजिक संघटनांमध्ये शोककळा पसरली आहे. सध्या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
66
विमान कोसळण्यापूर्वी काय झाले?
हवामान, तांत्रिक बिघाड किंवा डोंगराळ भागासारख्या पैलूंची चौकशी केली जात आहे. प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. उड्डाणानंतर काही मिनिटांत संपर्क तुटणे आणि नंतर संपूर्ण विमान नष्ट होणे - या घटनेने अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण केले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यावरच सत्य समोर येईल.