
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यातील एकूण निकालात मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. निकाल जाहीर होताच लाखो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वेबसाईटवर गर्दी केली.
यंदाच्या निकालात छत्रपती संभाजीनगर विभागाची कामगिरी विशेष चर्चेत राहिली. या विभागाचा निकाल अपेक्षेपेक्षा कमी लागल्याची चर्चा सुरू असतानाच विद्यार्थिनींनी मात्र उत्कृष्ट कामगिरी करत आपला दबदबा कायम ठेवला. विभागाचा उत्तीर्णतेचा टक्का 88.41 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
राज्याच्या एकूण निकालात मुलींचा पास टक्का मुलांच्या तुलनेत जास्त राहिला. मागील काही वर्षांप्रमाणे यंदाही मुलींनी सातत्यपूर्ण यश कायम ठेवले आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, नियमित अभ्यास, शिस्त आणि परीक्षेची तयारी यामुळे मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. तर काही विभागांचा निकाल तुलनेने कमी राहिल्याचे चित्र दिसून आले. पुणे, मुंबई आणि कोल्हापूर विभागांनीही चांगली कामगिरी केली आहे.
यंदा राज्यभरातून 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी SSC परीक्षेला हजेरी लावली होती. सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालक निकालाच्या प्रतीक्षेत होते. मंडळाने अधिकृत वेबसाईट, DigiLocker आणि SMS सुविधेद्वारे निकाल उपलब्ध करून दिला.
निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळवण्यासाठी अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. बोर्डाने यासाठी स्वतंत्र प्रक्रिया जाहीर केली असून निकालाबाबत शंका असल्यास विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात.