
Summer Hydration Mistakes The Risks of Drinking Too Much Water : उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायला हवं, हे अगदी खरं आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी आणि टिश्यू योग्यप्रकारे काम करण्यासाठी पाण्याची गरज असते. म्हणूनच डॉक्टर आपल्याला पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला देतात. तुम्हाला माहितीये का, आपल्या शरीराचा जवळपास ८० टक्के भाग पाण्यानेच बनलेला आहे.
पण, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो, तसंच पाण्याचंही आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही, असं कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन कन्सल्टन्ट डॉ. एन. आर. शेट्टी सांगतात.
जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडतं. यामुळे 'हायपोनेट्रेमिया' (Hyponatremia) किंवा 'वॉटर इन्टॉक्सिकेशन' (Water Intoxication) नावाची गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असं डॉ. शेट्टी यांनी सांगितलं. या असंतुलनामुळे शरीरातील पेशींना सूज येते. गंभीर प्रकरणांमध्ये, मेंदूच्या पेशींना सूज आल्यास डोकेदुखी, गोंधळल्यासारखं होणं आणि जीवाला धोका निर्माण होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
किती पाणी प्यावं यासाठी कोणतंही ठरलेलं गणित नाही. त्याऐवजी, डॉ. शेट्टी एक सोपा मार्ग सुचवतात. उन्हाळ्यात जेव्हा तहान लागेल, तेव्हाच पाणी प्या. तसंच, तुमच्या लघवीच्या रंगाकडे लक्ष देणंही महत्त्वाचं आहे. फिकट पिवळा रंग म्हणजे शरीरात पाण्याची पातळी योग्य आहे.
बहुतेक लोक दिवसातून ६ ते ८ वेळा लघवीला जातात, पण जर तुम्ही दिवसातून दहापेक्षा जास्त वेळा लघवीला जात असाल, तर समजा की तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी पित आहात. जास्त पाणी प्यायल्याने रात्रीसह वारंवार लघवीला जावं लागतं.
एकदम स्वच्छ, पाण्यासारखी लघवी हे ओव्हरहायड्रेशनचं (Overhydration) लक्षण आहे. पाण्यासोबतच इलेक्ट्रोलाइट्स असलेले पदार्थ, उदाहरणार्थ ताक किंवा नारळपाणी पिणं खूप फायदेशीर ठरतं. 'आरोग्य म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं नाही, तर संतुलन साधणं आणि आपल्या शरीराला नक्की काय हवं आहे हे समजून घेणं आहे,' असं डॉ. एन. आर. शेट्टी यांनी स्पष्ट केलं.