
नवी दिल्ली : कॅनडातील आयटी सेक्टरमधल्या कामाच्या ताणामुळे वैतागून एका सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअरने नोकरी सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर (Reddit) त्याने शेअर केलेली एक पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली आहे. यानंतर परदेशातील कामाचा ताण आणि नोकरीतील आव्हानांवर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या ३७ वर्षीय व्यक्तीने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. त्याची स्वतःची १३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तो कॅनडामध्ये पत्नी आणि सहा महिन्यांच्या मुलीसोबत राहतो. अहमदाबादमधील वडिलोपार्जित घर वगळून त्याची स्वतःची कमाई १३ कोटी रुपये आहे, असं त्याने स्पष्ट केलं आहे. यामध्ये ७ कोटी रुपये यूएस शेअर बाजारात, २.५ कोटी रुपये पेन्शन फंडात, १.५ कोटी रुपये सोन्यात आणि २ कोटी रुपये जमिनीमध्ये गुंतवलेले आहेत.
अहमदाबादमधील घराची किंमत २.५ कोटी असली तरी त्यावर १ कोटी रुपयांचं बँक कर्ज आहे. त्यामुळे या घराचा समावेश त्याने १३ कोटींच्या हिशोबात केलेला नाही. याशिवाय त्याच्या पत्नीची वेगळी बचत आहे. सध्या कॅनडातून तो वर्षाला सुमारे ४० लाख रुपये कमावतो. पण भारतात परतल्यावर साधी नोकरी केली तरी वर्षाला २५ लाख रुपये सहज कमावता येतील, असा त्याचा अंदाज आहे. त्यामुळे केवळ १५ लाख रुपये जास्त कमावण्यासाठी कॅनडात राहून एवढा मोठा मानसिक ताण आणि अनिश्चितता सहन करण्याची खरंच गरज आहे का? असा प्रश्न त्याने आपल्या पोस्टमधून विचारला आहे.
ही पोस्ट समोर येताच लोकांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला. 'तुमच्याकडे पुरेशी संपत्ती आहे, त्यामुळे लगेच भारतात परत या आणि कुटुंबासोबत वेळ घालवा,' असा सल्ला बहुतेक लोकांनी दिला. तर काही जणांनी आपले अनुभव सांगत 'कॅनडातील कामाचं वातावरण दिवसेंदिवस खराब होत चाललं आहे, त्यामुळे भारतात परतण्याचा निर्णय योग्यच आहे,' असं म्हटलं आहे. या पोस्टमुळे परदेशात स्थायिक झालेल्या आणि आता भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या लोकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.