
Golden Berry बाजारातल्या भेसळयुक्त भाज्या आणि केमिकल लावलेल्या फळांना लोक आता चांगलेच कंटाळले आहेत. त्यामुळे हळूहळू का होईना, पण लोक आता बागकामाकडे (Gardening) वळत आहेत. आजकाल किचन गार्डनपासून ते टेरेसवर फुलं आणि भाज्या लावण्याचा ट्रेंड चांगलाच वाढलाय. यात थोडी मेहनत घेतली की फक्त केमिकल-फ्री उत्पादनच नाही, तर घरातली हवाही शुद्ध राहते. तुम्हीही पहिल्यांदाच घरी शेती करण्याचा विचार करत असाल, पण काय लावावं हे कळत नसेल, तर चिंता करू नका. अशी अनेक फळं आणि भाज्या आहेत, जी कमी वेळेत उगवतात आणि चवीलाही भारी लागतात. याचंच एक उदाहरण म्हणजे लाल, रसरशीत आणि आरोग्यदायी रसभरी. ही तुम्ही घरी अगदी सहज लावू शकता आणि फक्त 90 दिवसांत याला फळंही येतात.
बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या रसभरीचे बी मिळतात. पण घरी लावण्यासाठी तुम्ही गोल्डन किंवा लाल रसभरी निवडू शकता. याला फळं लवकर येतात आणि छोट्याशा बॅगमध्येही हे रोप लावता येतं.
रसभरीच्या बिया तुम्हाला नर्सरीमध्ये मिळतील किंवा तुम्ही घरीही तयार करू शकता. पिकलेल्या रसभरीमधून बिया काढून त्या सुकवत ठेवा. काही दिवसांनी त्याला कोंब फुटू लागतील.
रोप कोणतंही असो, जोपर्यंत मातीचं प्रमाण योग्य नसतं, तोपर्यंत त्याला फुलं आणि फळं येत नाहीत. रसभरी लावण्यासाठी तुम्ही 12 ते 15 इंचाची कुंडी किंवा ग्रो बॅग वापरू शकता. माती तयार करण्यासाठी 35% पोयट्याची माती, 35% खत आणि 30% वाळू वापरा. एक गोष्ट लक्षात ठेवा की, माती पाण्याचा निचरा होणारी असावी, नाहीतर तुमची सगळी मेहनत वाया जाईल. या मातीत बी लावून रोपाला व्यवस्थित वाढू द्या.
रसभरीच्या रोपाला रोज उन्हाची गरज असते. तुम्ही ते ६-८ तास थेट सूर्यप्रकाशात ठेवू शकता. यासाठी बाल्कनी किंवा गच्ची उत्तम जागा आहे. पण फक्त उन्हात ठेवून चालणार नाही, तर मातीकडेही लक्ष द्यावं लागेल. या रोपाला जमिनीत ओलावा आवडतो. त्यामुळे जेव्हा कुंडीतील वरची 1-2 इंच माती सुकलेली दिसेल, तेव्हा पाणी द्या. दर 20 दिवसांनी गांडूळ खताचा (Vermicompost) वापर करा. रोपाला फुलं आली असतील, तर खत म्हणून केळ्याच्या सालींचा वापर करा. यामुळे फळं चांगली आणि मोठी होतात.
रसभरीचं रोप वेगाने वाढतं, त्यामुळे त्याला आधाराची गरज असते. या रोपाची उंची 2 ते 6 फुटांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे वेलीला आणि पानांना आधार देण्यासाठी बांबूच्या काडीचा वापर करा. बी लावल्यानंतर साधारण 60 ते 80 दिवसांत फळं यायला लागतात. जेव्हा रसभरीच्या फळावरचं कवच (husk) तपकिरी रंगाचं होईल, तेव्हा समजा की फळं खाण्यासाठी तयार आहेत.
भारतात रसभरीची किंमत तिचा सिझन आणि उपलब्धतेवर अवलंबून असते. हिवाळ्यापासून ते एप्रिलपर्यंतचा काळ यासाठी उत्तम मानला जातो. मंडईमध्ये ही 150 ते 300 रुपये किलोपर्यंत मिळते, तर ऑनलाइन स्टोअर्सवर पॅकेटनुसार याची किंमत 500 ते 600 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
भारतात रसभरीला मकोई, पोपटी, चिरबोटी, टेंटारी, पोपटान अशा वेगवेगळ्या नावांनीही ओळखलं जातं.