Bike News: बाईकचा आवाज वाढवण्यासाठी सायलेन्सर बदलणं किंवा आकर्षक दिसण्यासाठी भडक हेडलाइट्स लावणं, हे प्रकार सर्रास दिसतात. पण नवीन मोटार वाहन कायदा 2019 नुसार, ही हौस तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते आणि मोठं नुकसान होऊ शकतं.
तुमच्या गाडीत ARAI (Automotive Research Association of India) ने प्रमाणित न केलेले पार्टस् लावले असतील, तर पोलीस तुमचे चलन फाडू शकतात. यात मोठा आवाज करणारे सायलेन्सर, बदललेले टेल लाईट्स, हेडलाइट्स, वेगळे टायर्स किंवा सस्पेन्शन यांचा समावेश आहे. पहिल्यांदा पकडले गेल्यास तुम्हाला ₹5,000 पर्यंत दंड होऊ शकतो. तीच चूक पुन्हा केल्यास दंडाची रक्कम ₹10,000 पर्यंत वाढू शकते. इतकंच नाही, तर पोलीस तुमची गाडी जप्त करू शकतात किंवा तिची नोंदणी निलंबित करू शकतात.
23
सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य
हा दंड आकारण्यामागे सरकारचा मुख्य उद्देश 'रस्त्यावरील सुरक्षा' हा आहे. जेव्हा आपण बाईकचं इंजिन किंवा डिझाइन बदलतो, तेव्हा ते कंपनीच्या सुरक्षा मानकांपासून दूर जातं. मोठा आवाज करणारे सायलेन्सर ध्वनी प्रदूषण करतात, तर बदललेले हेडलाइट्स समोरून येणाऱ्या ड्रायव्हरच्या डोळ्यांवर थेट प्रकाश टाकून अपघाताचा धोका वाढवतात. त्यामुळे, गाडीतील प्रत्येक छोटा-मोठा पार्ट ARAI प्रमाणित असणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे.
33
गॅरेज मालकांवरही कारवाई
हे नियम फक्त बाईक मालकांसाठीच नाहीत, तर असे पार्टस् विकणाऱ्या किंवा बसवणाऱ्या मेकॅनिकसाठीही आहेत. जे गॅरेज किंवा डीलर अनधिकृत पार्टस् विकतील किंवा बसवतील, त्यांना तब्बल ₹25,000 पर्यंतचा मोठा दंड होऊ शकतो. याचा अर्थ, तुम्ही एखाद्या मेकॅनिककडून बेकायदेशीर काम करून घेत असाल, तर त्याचे परिणाम त्यालाही भोगावे लागतील. त्यामुळे, तुमची बाईक स्टायलिश बनवण्याच्या नादात नियम मोडू नका.