
Gardening Tips जून महिन्याच्या अखेरपर्यंत देशभरात मान्सून दाखल होतो. झाडांसाठी हा सिझन खूप फायदेशीर मानला जातो. पण पावसाळा सुरू होण्याआधीच तुम्ही काही तयारी केली, तर तुमची बाग फुलं आणि भाज्यांनी अक्षरशः लगडून जाईल. चला, जाणून घेऊया अशी कोणती चार महत्त्वाची कामं आहेत, जी पावसाळा सुरू होण्याआधीच करून घ्यायला हवीत.
पावसाळ्याआधीच कुंडीतली आणि बागेतली माती भुसभुशीत करून घेण्याचं काम पूर्ण करा. माती थोडी सैल केल्यामुळे झाडांच्या मुळांपर्यंत हवा व्यवस्थित पोहोचते आणि त्यांची वाढही चांगली होते. बागेत सुकलेली पानं, गवत किंवा फांद्या पडल्या असतील, तर त्याही काढून बाग स्वच्छ करा.
पावसाळ्यापूर्वी झाडांना शेणखत, वर्मीकंपोस्ट किंवा घरी बनवलेलं सेंद्रिय खत नक्की घाला. जर तुमच्या बाल्कनीत छोटी रोपं असतील, तर खत आणि माती आधीच व्यवस्थित एकत्र करून घ्या. यामुळे फुलं आणि भाज्यांचं उत्पादन वाढायला मदत होते.
पावसाळ्यात अनेकदा बागेत पाणी साचतं, ज्यामुळे झाडं सडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याची योग्य सोय करणं खूप गरजेचं आहे. जर बागेत कुंड्या असतील, तर त्यांच्या ड्रेनेज होल (पाणी जाण्यासाठी असलेलं छिद्र) तपासा आणि वाफ्यांमध्ये पाणी बाहेर जाण्यासाठी एक छोटा मार्ग तयार करा. यामुळे पाणी साचणार नाही आणि झाडांना बुरशीजन्य संसर्गापासून (fungal infection) वाचवता येईल.
पावसाळ्यात तुम्ही बागेत नवीन रोपं लावू शकता, कारण या काळात झाडांची वाढ खूप वेगाने होते. टोमॅटो, मिरची, भेंडी, कोथिंबीर यांसारख्या भाज्या तुम्ही सहज लावू शकता. पावसाच्या ओलाव्यामुळे रोपं झपाट्याने वाढतात आणि तुमची बाग भाज्या आणि फुलांनी भरून जाईल. झाडांना किडींपासून वाचवण्यासाठी कडुलिंबाचं तेल पाण्यात मिसळून त्याची फवारणी नक्की करा.