
चेन्नई: भारतीय टी-२० संघात ओपनर्स सतत बदलण्याच्या पद्धतीवर भारताचा माजी क्रिकेटपटू एस. बद्रीनाथने जोरदार टीका केली आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीला पुढच्या किमान १० टी-२० सामन्यांमध्ये सलग ओपनिंगची संधी द्यायला हवी, अशी मागणी त्याने केली आहे. १५ वर्षांचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला संधीसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागेल, असं बद्रीनाथने त्याच्या 'क्रिक इट विथ बद्री' या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितलं.
पुढच्या १० टी-२० सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनीच भारतासाठी ओपनिंग केली पाहिजे. त्यानंतरही जर संजू अपयशी ठरला, तरच त्याला वगळून वैभव सूर्यवंशीचा विचार करता येईल. पण प्रत्येक मालिकेत ओपनर्स बदलून प्रयोग करणं हा संजूवर अन्याय आहे, असंही बद्रीनाथ म्हणाला.
सध्या संजूला अचानक बाहेर काढून दुसऱ्या युवा खेळाडूला आणण्याची कोणतीही परिस्थिती नाही, याकडे बद्रीनाथने लक्ष वेधलं. संजू हा वर्ल्ड कप जिंकून देणारा खेळाडू आहे. शिवाय, अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने २२ चेंडूत ५७ धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळे या वर्षाच्या अखेरपर्यंत तरी संजूला सलग संधी मिळायला हवी आणि त्यानंतरच काय तो निर्णय घ्यावा, असं बद्रीनाथने स्पष्ट केलं.
झिम्बाब्वे दौऱ्यात जबरदस्त कामगिरी करत 'प्लेअर ऑफ द सिरीज' ठरलेल्या वैभव सूर्यवंशीला अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघात स्थान मिळालं नव्हतं. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. आता दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणारा शेवटचा टी-२० सामना जिंकून मालिकेत 'क्लीन स्वीप' देण्याचं भारताचं लक्ष्य आहे.