Brain Fade: स्मिथच्या 'त्या' कृत्यामागे होता मोठा प्लॅन, पुजाराने ७ वर्षांनी केला गौप्यस्फोट

vivek panmand   | CMS
Published : Sep 12, 2026, 05:17 PM IST
cricket

सार

2017 च्या बंगळुरू कसोटीत स्टीव्ह स्मिथने DRS साठी ड्रेसिंग रूमकडे मदत मागितली होती. तो 'ब्रेन फेड' नव्हता, तर ऑस्ट्रेलियाचा ठरवून केलेला प्लॅन होता, असा गौप्यस्फोट चेतेश्वर पुजाराने केला आहे.

राजकोट: 2017 मधली भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आठवतेय? क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अटीतटीच्या लढतींपैकी एक म्हणून ती ओळखली जाते. भारताने ती मालिका 2-1 ने जिंकली होती, पण त्यातील सर्वात मोठा वाद होता बंगळुरू कसोटीतला. स्टीव्ह स्मिथच्या 'ब्रेन फेड' नावाने गाजलेल्या त्या घटनेबद्दल आता भारताचा माजी खेळाडू चेतेश्वर पुजाराने एक मोठा खुलासा केला आहे.

त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघ DRS चे निर्णय घेण्यासाठी ड्रेसिंग रूममधील लाईव्ह टीव्ही फुटेजचा गैरवापर करत होता, असा गौप्यस्फोट पुजाराने केला आहे. आकाश चोप्रासोबतच्या एका मुलाखतीत पुजाराने त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, हे सविस्तर सांगितलं. बंगळुरू कसोटीच्या चौथ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 188 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यावेळी उमेश यादवच्या एका बॉलवर स्टीव्ह स्मिथ LBW झाला. मैदानावरील अंपायरने त्याला आऊट दिलं. पण रिव्ह्यू घ्यायचा की नाही, हे नॉन-स्ट्रायकरला विचारण्याऐवजी स्मिथने थेट ड्रेसिंग रूमकडे बघून इशारा केला.

ही गोष्ट तेव्हाचा कॅप्टन विराट कोहलीच्या लक्षात आली आणि त्याने लगेच अंपायरकडे तक्रार केली. अंपायर्सनी हस्तक्षेप करत स्मिथला रिव्ह्यू घेण्यापासून रोखलं आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. मॅचनंतर स्मिथने 'माझ्याकडून चूक झाली, तो एक ब्रेन फेड क्षण होता' असं स्पष्टीकरण दिलं होतं. पण पुजाराच्या मते, ही केवळ चूक नव्हती, तर ऑस्ट्रेलियन संघाचा हा एक ठरवलेला प्लॅन होता.

पुजारा म्हणाला, "ऑस्ट्रेलियाचे DRS निर्णय जवळपास नेहमीच अचूक असायचे. त्यांना नक्की माहिती असायचं की रिव्ह्यू कधी घ्यायचा आणि कधी नाही. त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये लाईव्ह फीड होतं, हे आम्हाला तोपर्यंत माहीतच नव्हतं. सामान्यतः ड्रेसिंग रूममधल्या टीव्हीवर काही सेकंद उशिरा फुटेज दिसतं. पण बंगळुरू कसोटीत त्यांना लाईव्ह फुटेज मिळत होतं. कुणाचं लक्ष नाही असं बघून ते ड्रेसिंग रूमकडे इशारा करायचे आणि तिथून मिळणाऱ्या सिग्नलवर रिव्ह्यू घ्यायचे."

"हा सरळसरळ अन्याय होता. हेच जर दुसऱ्या कोणत्या टीमने केलं असतं, तर ऑस्ट्रेलियाने केवढा गोंधळ घातला असता," असंही पुजाराने स्पष्ट केलं. तो पुढे म्हणाला की, 2012 मध्ये इंग्लंडने भारतात मालिका जिंकल्यानंतर, भारताला भारतात हरवण्याची क्षमता असलेला पहिला संघ म्हणजे स्टीव्ह स्मिथचा तो ऑस्ट्रेलियन संघ होता. मालिका जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार होते. त्या मालिकेतील तणावामुळे आपणही स्लेजिंग केलं होतं, असं पुजाराने कबूल केलं. पुण्यातील पहिली कसोटी गमावल्यानंतर, भारताने बंगळुरूमध्ये 75 धावांनी विजय मिळवून मालिकेत पुनरागमन केलं आणि अखेरीस 2-1 ने मालिका जिंकली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Traffic Advisory: दिल्लीत भारत-अफगाणिस्तान मॅच, रस्त्यावर उतरण्यापूर्वी वाहतुकीचे नियम नक्की वाचा!
Shubman Gill: क्रिकेटचा 'प्रिन्स' फुटबॉलच्या 'वॉल'ला भेटला, फोटो व्हायरल!