
Ind vs Pak Asia Cup : आशिया कप २०२५ च्या सुपर-४ सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ समोरासमोर आले आणि भारताने हा सामना ६ विकेट्सने जिंकला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झाला, जिथे भारतीय खेळाडूंच्या शानदार कामगिरीमुळे स्टँड्समध्ये बसलेले चाहते त्यांना चिअर करत होते. हे पाहून पाकिस्तानी खेळाडू हारिस रौफला मिरची लागली आणि त्याने असे कृत्य केले, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याची नाचक्की झाली आणि लोक त्याच्या या कृत्याला लाजिरवाणे म्हणत आहेत.
क्रिकेट हा जेंटलमनचा खेळ आहे, असं म्हणतात, जिथे खेळाडूंकडून आदराची अपेक्षा केली जाते. पण पाकिस्तानी खेळाडूंकडून ही अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. होय, नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि सीमारेषेजवळ उभे राहून एक विचित्र कृत्य केले. खरं तर, हारिस रौफ जेव्हा क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा मागून चाहते 'विराट कोहली' ओरडत होते. यावेळी त्याने हाताने अपमानजनक 'जेट डाउन' सिग्नलचा इशारा केला. भारतीय विमानांचे पाकिस्तानवरील 'ऑपरेशन सिंदूर' हा खोटा दावा आहे, हे दाखवणे हा त्याचा उद्देश होता. त्याचे हे लाजिरवाणे कृत्य सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि लोक त्याला वाईटरित्या ट्रोल करत आहेत.
याआधी, फलंदाजीदरम्यान पाकिस्तानी सलामीवीर साहिबजादा फरहाननेही एक लाजिरवाणे कृत्य केले. अर्धशतक पूर्ण झाल्यावर, त्याने सेलिब्रेशनसाठी आपली बॅट बंदुकीसारखी धरून भारतीय चाहत्यांच्या स्टँडच्या दिशेने गोळ्या झाडण्याचा इशारा केला. त्यामुळे त्याची फजिती झाली आणि चाहते त्याला ट्रोल करत आहेत की ही तर पाकिस्तानची पारंपरिक शैली आहे. पण या कृत्यांमुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा नक्कीच डागाळली आहे.
दुसरीकडे, भारतीय खेळाडूंनी समजूतदारपणा दाखवत कोणताही ड्रामा न करता, जेंटलमन गेम मर्यादेत खेळून ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ५ गडी गमावून १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १८.५ षटकांत चार गडी गमावून १७४ धावा करून सामना जिंकला. यात अभिषेक शर्माने सर्वाधिक ७४ धावा, शुभमन गिलने ४۷, तिलक वर्माने ३० आणि संजू सॅमसनने १३ धावांची खेळी केली.