
ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या समीकरणं बदलण्याचे वारे वेगाने वाहत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील 'नंदनवन' निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत (UBT) युती केल्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गेल्या वर्षी 'ठाकरे बंधू' एकत्र आले, महापालिका निवडणुकांमध्ये त्यांनी महायुती सरकारवर कडाडून टीका केली. मात्र, निवडणुकांचे निकाल लागताच चित्र बदलल्याचे पाहायला मिळाले.
कल्याण-डोंबिवलीचा फॉर्म्युला: महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच कल्याण-डोंबिवलीत मनसेने थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जुळलेली ही 'मनसे-शिंदे सेना' केमिस्ट्री आता राज्याच्या राजकारणात नव्या वळणाची संकेत देत आहे.
लवचिक भूमिकेची चर्चा: बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी केलेल्या पोस्टमध्ये 'लवचिक भूमिके'चा उल्लेख केला होता. आजची भेट त्याच भूमिकेचा भाग असल्याचे बोलले जात आहे.
ठाकरे बंधू एकत्र लढले खरे, पण अपेक्षित यश त्यांच्या पदरी पडले नाही. मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये या युतीला बहुमताचा आकडा गाठता आला नाही.
फायदा कोणाला? मुंबईत युतीचा सर्वाधिक फायदा उद्धव ठाकरेंना झाला (६५ जागा), तर मनसेला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी अस्वस्थता होती.
विरोधाभासाचे राजकारण: एकीकडे मनसेने कल्याणमध्ये शिंदेंना साथ दिली, तर दुसरीकडे चंद्रपुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने चक्क भाजपला पाठिंबा दिला. या परस्परविरोधी भूमिकांमुळे ठाकरे बंधूंच्या युतीत 'बेबनाव' असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मनसेने शिंदेंना दिलेल्या पाठिंब्यावर खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली असली, तरी राज ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहेत. शिंदेंच्या भेटीनंतर आता मनसे आगामी काळात 'एकला चलो रे'ची भूमिका घेणार की शिंदेंच्या महायुतीजवळ जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.