शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती? जयंत पाटील अखेर पायउतार?

Published : Jul 12, 2025, 04:31 PM ISTUpdated : Jul 12, 2025, 04:38 PM IST
shashikant Shinde

सार

विशेष म्हणजे शरद पवारांनी या पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातूनच एक निष्ठावंत, अनुभवसंपन्न चेहरा पुढे केला आहे. त्यामुळे पक्षातील जुनी निष्ठावंत गटबांधणी जपण्यासह नव्या पिढीला दिशा देण्याचे काम शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (शरद पवार गट) नेतृत्वाच्या पातळीवर मोठा बदल झाल्याचे सांगितले जात आहे. अखेर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील यांच्या पदावरून पायउतार होण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आता त्यांच्या जागी सातारचे आमदार आणि पवारांचे निष्ठावान सहकारी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, याची अधिकृत घोषणा झालेली नाही. १५ जुलै रोजी ही घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते.

या बदलामागे पक्षांतर्गत अनेक राजकीय घडामोडी, नाराजी, आणि संघटनात्मक आवश्यकतांचा विचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनी या पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातूनच एक निष्ठावंत, अनुभवसंपन्न चेहरा पुढे केला आहे. त्यामुळे पक्षातील जुनी निष्ठावंत गटबांधणी जपण्यासह नव्या पिढीला दिशा देण्याचे काम शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवले जाईल असे सांगितले जात आहे.

शशिकांत शिंदे : पवारांचे निष्ठावान शिलेदार

शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांनी नेहमीच पक्षाच्या नेतृत्वाला आवश्यक असलेल्या कठीण प्रसंगात ढाल बनून साथ दिली आहे. उदयनराजे भोसले, शालिनी ताई पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांविरुद्ध देखील त्यांनी पक्षाच्या आदेशावरून निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेतली होती.

लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्या विरोधात त्यांनी परिश्रमांची पराकाष्ठा केली होती. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातूनही त्यांनी निवडणूक लढवली, जिथे त्यांचा महेश शिंदे यांच्या हातून थोडक्यात पराभव झाला. तरीसुद्धा त्यांच्या निष्ठेमुळे त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आणि त्यांनी तिथेही आपली भूमिका प्रभावीपणे निभावली.

सध्याच्या अधिवेशनातही शिंदे विविध प्रश्नांवर ठामपणे भूमिका मांडताना दिसले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वगुणांची आणि वक्तृत्व कौशल्याची दखल घेऊन शरद पवारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

सांगली ते संपूर्ण महाराष्ट्र : संघटनात्मक प्रभाव

शशिकांत शिंदे हे मुळचे सांगली जिल्ह्यातील असून त्यांच्या संघटन कौशल्याची ओळख संपूर्ण राज्यभर आहे. माथाडी कामगार संघटनांमध्ये त्यांचा ठसा आहे. त्यामुळे राज्यभरातील कामगार वर्ग, मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. हीच ओळख आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची क्षमता त्यांना नव्या जबाबदारीसाठी योग्य उमेदवार ठरवते.

पक्षात सध्या तरुणांना संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत होती. त्यामुळे शिंदेंची निवड ही फक्त निष्ठेवर आधारित नसून, संघटनात्मक बळ आणि जनाधारावरही आधारित आहे, असे मानले जात आहे.

जयंत पाटील यांचे मवाळ नेतृत्व आणि नाराजी

जयंत पाटील हे गेली अनेक वर्षे प्रदेशाध्यक्षपदी होते. त्यांनी शरद पवारांसोबत राज्यभर धावपळ करत पक्षबांधणीसाठी परिश्रम घेतले. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. विशेषतः विधानसभा निवडणुकीत प्रचारात ताकद लावूनही अनेक बालेकिल्ल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे हे पक्षाचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जातात. मात्र या भागांत पक्षाची पीछेहाट झाली. पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी निर्माण झाली होती. काही पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांच्या कार्यशैलीवर खुल्या शब्दांत टीका केली होती. रोहित पवार यांच्याशीही त्यांच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती.

त्याचबरोबर जयंत पाटील कधी अजित पवार गटाच्या जवळ गेले, तर कधी भाजपशी सलगी वाढल्याच्या चर्चाही रंगल्या. या सर्व घडामोडींमुळे त्यांचं नेतृत्व संकटात आले होते. त्यामुळे पवारांनी बदलाची गरज ओळखून नव्या नेतृत्वाला संधी दिली.

शशिकांत शिंदे यांच्यासमोरील आव्हाने

शशिकांत शिंदे यांच्यासमोर सध्या अनेक मोठी आव्हाने आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांमध्ये पक्षाला पुनश्च बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र बांधणे, नाराज नेत्यांना समजावणे, आणि पक्षाच्या विचारधारेवर पुन्हा विश्वास बसवणे हे प्रमुख उद्दिष्ट राहील.

पक्षामध्ये पुन्हा उत्साह निर्माण करून नवीन कार्यकर्त्यांना जोडणे, युवकांना संधी देणे, आणि समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पवारांची विचारधारा पोहोचवणे ही मुख्य जबाबदारी शिंदेंवर आहे. विशेषतः बालेकिल्ल्यांमध्ये पक्ष पुनरुज्जीवन करू शकतो का, यावर त्यांचे यश अवलंबून असेल.

नव्या नेतृत्वाकडून अपेक्षा

शरद पवार यांनी पक्षात जरी वयोवृद्ध आणि अनुभवी नेतृत्त्व राखले असले, तरीही बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता तरुण आणि जमीनीवर काम करणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे. शशिकांत शिंदे यांच्याकडे अनुभव आणि नवचैतन्य यांचा उत्तम संगम आहे. त्यामुळे ते पक्षाचे संघटन मजबूत करतील, अशी अपेक्षा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावर शशिकांत शिंदे यांची निवड ही पक्षाच्या नव्या वाटचालीचा आरंभ मानली जात आहे. जुने कार्यकर्ते, स्थानिक पातळीवरील संघटन, आणि तरुणांची ऊर्जा यांचा समन्वय साधून शिंदेंनी पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे आव्हान स्वीकारले आहे. ही निवड पक्षासाठी निर्णायक ठरू शकते. राजकारणात निष्ठा, अनुभव आणि जनाधार यांची किंमत असते, आणि शशिकांत शिंदे हे त्याचेच एक जिवंत उदाहरण ठरले आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!