
मुंबई : मुंबईतील कांदिवली पूर्वेकडील एका मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा समता नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका ४८ वर्षीय व्यक्तीला रंगेहाथ अटक केली. हा इसम नागरिकांना विकल्या जाणाऱ्या ब्रँडेड दुधात भेसळ करत होता.
मुंबई पोलिसांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी म्हटलं आहे की, "समता नगर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन स्कॉडने कांदिवली पूर्वेतील एका घरावर छापा टाकला. तिथे एक ४८ वर्षीय व्यक्ती ब्रँडेड दुधात अशुद्ध पाणी मिसळून विकण्याच्या तयारीत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आलं."
🔸Samta Nagar Police bust milk adulteration racket; accused arrested red-handed!
The Detection Squad of @SamtaNagarPS raided a residence in Kandivali East and caught a 48-year-old man red-handed while adulterating branded milk with impure water for sale.
During the raid, 74… pic.twitter.com/0x9NRkDotr— मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) August 13, 2026
या भागात भेसळीचा गोरखधंदा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या डिटेक्शन स्कॉडने एका घरावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी हा अवैध प्रकार उघडकीस आणून आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि भेसळीसाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त केलं आहे.
पोलिसांनी सांगितलं की, "या छाप्यात अमूल आणि गोकुळ या ब्रँडचे लेबल असलेले ७४ लिटर भेसळयुक्त दूध, भेसळीसाठी वापरलं जाणारं साहित्य आणि बनावट रिकाम्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत."
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. "नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी मुंबई पोलीस कटिबद्ध आहेत," असंही पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
याआधी ३१ जुलै रोजी सरकारने संसदेत माहिती दिली होती की, २०२५-२६ या वर्षात देशभरातून घेतलेले ४०,००० हून अधिक अन्न नमुने, ज्यात शीतपेये आणि कॅफिनयुक्त पेयांचाही समावेश होता, ते निकृष्ट दर्जाचे आढळले. अन्न सुरक्षेच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांमध्ये १,९१८ दोषींना शिक्षा झाली.
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं की, २०२५-२६ मध्ये २,२३,८०८ अन्न नमुन्यांचं विश्लेषण करण्यात आलं. त्यापैकी ४०,०२३ नमुने भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे आढळले. सरकारने सांगितलं की, ३१,८७८ दिवाणी खटल्यांमध्ये दंड ठोठावण्यात आला, तर १,९१८ फौजदारी खटल्यांमध्ये आरोपींना दोषी ठरवण्यात आले. ही आकडेवारी प्राथमिक असून, पुढील प्रयोगशाळा चाचण्या आणि न्यायालयीन कार्यवाहीनंतर त्यात बदल होऊ शकतो, असंही सरकारने स्पष्ट केले. या आकडेवारीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा समावेश आहे.