
Mira-Bhayandar flyover : मीरा-भाईंदर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेला नवीन उड्डाणपूल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. चार पदरी उड्डाणपूल अचानक दोन पदरी होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) यांनी उड्डाणपुलाच्या डिझाइनबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.
एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे की उड्डाणपूल ‘अचानक अरुंद’ होत नाही. ४ पदरीवरून २ पदरी होणे ही डिझाइनमधील त्रुटी नसून, उपलब्ध रस्त्याच्या रुंदीच्या मर्यादा आणि भविष्यातील नेटवर्क नियोजनावर आधारित निर्णय आहे. नियोजनानुसार, हा उड्डाणपूल भाईंदर पूर्वेकडे दोन पदरी आणि भविष्यात भाईंदर पश्चिमेकडे जोडण्यासाठी दोन पदरी असा तयार करण्यात आला आहे. सध्या पूर्वेकडील मार्ग आधी येत असल्याने ४ पदरी रचना २ पदरीमध्ये रूपांतरित होताना दिसते.
एमएमआरडीएच्या माहितीनुसार, गोल्डन नेस्ट सर्कलपर्यंत जिथे पाच प्रमुख रस्ते एकत्र येतात. वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेट्रोसह एकात्मिक २+२ पदरी उड्डाणपूल आणि दोन्ही बाजूंना स्लिप रोडची व्यवस्था करण्यात आली आहे. या जंक्शनपुढे भाईंदर पूर्वेकडे उपलब्ध जागेची रुंदी कमी होत असल्याने मध्यभागी १+१ पदरी उड्डाणपूल समर्पित चढ-उतार मार्गांसह बांधण्यात आला आहे.
एमएमआरडीएने सांगितले की भविष्यात पूर्व-पश्चिम वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना अतिरिक्त १+१ पदरी मार्ग वाढवण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे. हा प्रस्ताव सध्या नियोजन टप्प्यात असून, मंजुरी मिळाल्यानंतर मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या समन्वयाने काम हाती घेतले जाईल.
प्राधिकरणाने उड्डाणपुलावर रंबल स्ट्रिप्स, डेलाइनिएटर्स, दिशादर्शक फलक, रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह टॅग आणि अँटी-क्रॅश बॅरियर्स यांसारखे आवश्यक सुरक्षा उपाय केले असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र, सोशल मीडियावर नागरिक अजूनही या रचनेवर प्रश्न उपस्थित करत असून, संपूर्ण उड्डाणपूल चार पदरी करण्याची मागणी होत आहे.