
मुंबई - उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात अवैध धर्मांतर प्रकरणात अटकेत असलेल्या छांगुर बाबावर आता केंद्रीय यंत्रणांचाही दबाव वाढला आहे. या प्रकरणात आता प्रवर्तन संचालनालय (ED) ने थेट एंट्री घेतली असून, गुरुवारी (१७ जुलै २०२५) सकाळपासून ईडीच्या अनेक टीम्सनी एकाच वेळी बलरामपूर ते मुंबईपर्यंत १४ ठिकाणी छापेमारी केली.
प्रवर्तन संचालनालयाने सकाळी ५ वाजता ही मोठी कारवाई सुरू केली. उत्तर प्रदेशमधील १२ ठिकाणी आणि मुंबईतील २ ठिकाणी एकाचवेळी रेड टाकण्यात आल्या. या कारवाईमध्ये ईडीच्या अधिकार्यांना काही महत्त्वाचे कागदपत्रे, बँक व्यवहारांचे पुरावे, तसेच डिजिटल डेटा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश ATS (दहशतवाद विरोधी पथक) ने काही दिवसांपूर्वी छांगुर बाबा आणि त्याची महिला सहयोगी नीतू हिला अटक केली होती. या दोघांना ७ दिवसांची कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या चौकशीत अनेक गंभीर खुलासे झाले होते. त्यानंतर आता ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा तपास हाती घेतला आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांची एक टीम सध्या मुंबईच्या वांद्रे भागात राहणाऱ्या शहजाद नावाच्या व्यक्तीची चौकशी करत आहे. शहजाद हा छांगुर बाबाचा जवळचा सहयोगी असल्याचे म्हटले जाते. त्याच्या बँक खात्यांमध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याच्या पुराव्यांवरून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
या सर्व छापेमारी दरम्यान संबंधित ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. विशेषतः बलरामपूरमधील स्थानिक नागरिकांमध्ये या कारवाईमुळे प्रचंड उत्सुकता आहे.
प्राथमिक तपासणीत असे समोर आले आहे की, जालालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याने शेकडो लोकांचे जबरदस्तीने किंवा आर्थिक आमिष दाखवून धर्मांतर केल्याचा आरोप आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेसाठी देश-विदेशातून आर्थिक मदत मिळाल्याचा संशय आहे. याच आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी ईडी आता पुढे सरसावली आहे.
या कारवाईमुळे अवैध धर्मांतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ईडीला काही हवालाबाजीच्या संदिग्ध व्यवहारांबाबतही माहिती मिळाली असून, काही बँक खात्यांचे लिंक विदेशी खात्यांशी असल्याचेही संकेत मिळाले आहेत. त्यामुळे हा तपास केवळ उत्तर प्रदेशापुरता मर्यादित न राहता, आता तो बहु-राज्यीय स्वरूपाचा आणि आंतरराष्ट्रीय फंडिंगशी संबंधित असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
या प्रकरणावरून राजकीय क्षेत्रातही उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी अशा प्रकारच्या अवैध धर्मांतरणावर कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. सामाजिक संस्थांनी देखील या कारवाईचे समर्थन करत सरकारने धर्म स्वातंत्र्याच्या उल्लंघनासंदर्भात कठोर धोरण राबवावे, अशी मागणी केली आहे.
ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, छापेमारीनंतर मिळालेल्या पुराव्यांची तांत्रिक तपासणी व फॉरेंसिक विश्लेषण करण्यात येणार आहे. अवैध फंडिंग, बोगस संस्था, आणि बेकायदेशीर आर्थिक देवाणघेवाण यासंदर्भातील आणखी पुरावे हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच शहजादसह इतर काही व्यक्तींना लवकरच समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.