
Ganpati Festival : मुंबई महापालिकेच्या (BMC) पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाला यंदा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू होऊन गणेश मूर्ती बनवण्याचा हंगामही सुरू झाला असताना शहरातील पारंपरिक मूर्तीकारांना अद्याप मोफत शाडू मातीचा पुरवठा मिळालेला नाही. यामुळे मूर्तीकारांमध्ये नाराजी आणि चिंता वाढली आहे.
पर्यावरणपूरक उत्सवासाठी बीएमसीने नोंदणीकृत मूर्तीकारांना 1,000 किलो (40 पोती) शाडू माती मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र, पावसाळा सुरू झाला असूनही अद्याप एकही पोते मिळाले नसल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे.
“एप्रिल-मे महिन्यात ही माती मिळणे अपेक्षित होते. तोच मूर्ती बनवण्याचा योग्य काळ असतो,” असे श्री गणेश मूर्तिकला समितीचे अध्यक्ष वसंत राजे यांनी सांगितले. भूषण परुळेकर या मूर्तीकाराने सांगितले की, शाडू मातीच्या मूर्तींना वाळण्यासाठी जास्त वेळ लागतो. पावसाळ्यात ओलावा वाढल्यामुळे प्रक्रिया अधिक कठीण होते. पुरवठा उशिरा झाल्यास स्वतःच्या खर्चाने माती खरेदी करावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले. अनुष्का गुजर या नोंदणीकृत मूर्तीकाराने सांगितले की, या विलंबामुळे हंगामी उत्पन्नावर थेट परिणाम होत असून उत्पादन प्रक्रिया अडचणीत आली आहे.
पावसाळ्यात शाडू मातीच्या मूर्ती वाळवणे कठीण जाते. त्यामुळे पर्यावरणपूरक मूर्तींचा प्रसार कमी होण्याची भीती मूर्तीकार व्यक्त करत आहेत. या विलंबामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) मूर्तींवर पुन्हा अवलंबित्व वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बीएमसीच्या गणपती उत्सव व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही भागांमध्ये खरेदी प्रक्रियेत अडथळे आले आहेत. पुरवठा साखळीचा आढावा घेऊन लवकरच शाडू मातीचे वितरण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मागील वर्षी बीएमसीने सुमारे 990 मेट्रिक टन शाडू माती 500 नोंदणीकृत मूर्तीकारांना दिली होती. मुंबईतील 1.81 लाख घरगुती मूर्तींपैकी सुमारे 30,000 ते 40,000 मूर्ती पर्यावरणपूरक शाडू मातीच्या होत्या. या वर्षी हा प्रगतीचा वेग टिकेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.