
जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचा एल्गार; 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने केंद्र सरकारवर दबाव दिल्लीतील जंतर-मंतर येथे शुक्रवारी झालेल्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने देशाचे लक्ष वेधून घेतले. नीट-यूजी पेपरफुटी, सीबीएसईच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीतील कथित त्रुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध समस्यांविरोधात हजारो विद्यार्थी आणि युवक रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
हे आंदोलन केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत असल्याचे आयोजकांनी सांगितले. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि निकाल प्रक्रियेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सोशल मीडियावर सुरू झालेली ही चळवळ आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिपके यांनी युवकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलन देशभर नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर आणि परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बॅरिकेड्स लावण्यात आले होते. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी आयोजकांनीही सहभागींचे आवाहन केले होते. अवघ्या काही आठवड्यांत सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवलेल्या या चळवळीला लाखो युवकांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. रोजगार, परीक्षा प्रक्रिया आणि शिक्षण व्यवस्थेतील अडचणींमुळे असंतुष्ट असलेल्या तरुणांसाठी हे व्यासपीठ बनल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
जंतर-मंतरवरील हे आंदोलन केवळ एका दिवसापुरते मर्यादित राहणार की त्याचे व्यापक राजकीय परिणाम दिसून येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित प्रश्नांवर युवकांचा वाढता असंतोष या आंदोलनातून समोर आला असून, येत्या काळात सरकारची भूमिका काय राहते हे महत्त्वाचे ठरणार आहे.