चंद्रपुरात पावसाचा कहर, शेकडो घरं पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत

Chandrapur Heavy Rain Monsoon Updates : चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. चंद्रपूर-मूल मार्गावर असलेल्या चिचपल्ली गावातील गावतलाव फुटल्याने गावातील अंदाजे 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरले आहे.

Rameshwar Gavhane | Published : Jul 21, 2024 7:20 AM IST

Chandrapur Heavy Rain Monsoon Updates : गेल्या दोन दिवसात उपराजधानी नागपूरसह पूर्व विदर्भाला अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. सध्या पूर्व विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात या पावसाने कहर केल्याचे बघायला मिळाले आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली गावातील गावतलाव फुटल्याने गावातील अंदाजे 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरले आहे. सलग दोन दिवस पाऊस झाल्याने गावतलावातील पाण्यात मोठी वाढ झाली. दरम्यान आज पहाटे तलावाची पाळ फुटून गावात पाणी शिरले आहे. परिणामी गावातील ग्रामस्थांचे धान्य आणि इतर साहित्याचे मोठं नुकसान झाले आहे. सोबतच गावातील जवळपास 100 बकऱ्या आणि इतर जनावरं देखील या पुरात दगावले आहेत.

अनेक घरं पाण्याखाली, शेकडो जनावरे दगावली

उपराजधानी नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना शनिवारच्या सकाळपासून कोसळणाऱ्य मुसळधार पावसाने धो-धो धुतलंय. दरम्यान अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्यावतीने केले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भाला बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावातील गावतलाव फुटल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अचानक आलेल्या या पाण्यामुळे शेकडो घरं पाण्याखाली गेली आहे. यात अनेक जनावरे देखील दगवली आहे. तर शेतकऱ्यांनी शेतीसाठी घरात आणून ठेवलेले खत आणि बी-बियाणेही पाण्यात भिजली आहे. एकुणात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि वित्त हानी झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व यंत्रणेला आदेश

महाराष्ट्रात पडत असलेल्या अतीमुसळधार पाऊसामुळे कुठे ही आपत्कालीन परिस्थिती उद्धभवू नये यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क रहाण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि आप्तकालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली. सर्व यंत्रणांना सतर्क रहाण्याचा आदेश यावेळी देण्यात आला आहे.

सह्याद्रीपर्वत रांगांच्या पूर्व आणि पश्चिम उतारावर अतीमुसळधार पाऊस पडत आहे. या ठिकाणी नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी पूर नियंत्रण यंत्रणा सज्ज करणे, तसेच रविवार असल्यामुळे वर्षा पर्यटनालाठी मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडले आहेत. त्यांना धोकादायक परीस्थितीची वेळीच जाणीव करून देणे सोबतच अती धोकादायक ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा : 

विधानसभा निवडणुकीचा भाजपाने ठरवला रोडमॅप, पुण्यातील बैठकीत ठरणार रणनीती

 

Share this article