
Maharashtra : वाशिमच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत त्यांनी समर्थकांसह मुंबई गाठत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. 29 वाहनांच्या ताफ्यासह झालेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे वाशिमच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुरेश मापारी यांच्या जागी बालाजी वानखेडे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली होती. या निर्णयामुळे मापारी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर त्यांनी पक्षाला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
सुरेश मापारी हे काल रात्रीच 200 ते 250 पदाधिकारी, सरपंच आणि कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाले होते. 29 वाहनांच्या मोठ्या ताफ्यामुळे या प्रवेशाची राज्यभरात चर्चा रंगली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे गटातील 8 नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश करत ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला.
सुरेश मापारी हे वाशिम जिल्ह्यातील प्रभावी नेते मानले जातात. जिल्हा परिषद सदस्य, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे असल्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय वर्तुळात खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याने मापारी यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यापूर्वी ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र अखेरीस त्यांनी भाजपची वाट निवडल्याने वाशिममधील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.
सुरेश मापारी यांच्या प्रवेशामुळे भाजपची ग्रामीण भागातील ताकद वाढल्याचे मानले जात आहे. त्यांच्या पाठिशी मोठा मतदारवर्ग आणि कार्यकर्त्यांची फौज असल्याने आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटासाठी ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. वाशिममध्ये हा प्रवेश ‘मोठा राजकीय धक्का’ म्हणून पाहिला जात आहे.