
Satara ZP Eleciton : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीदरम्यान झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींना हिंसक वळण लागल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेत मंत्र्यांमध्ये धक्काबुक्की झाली, तसेच पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठी कारवाई करत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडे स्पष्ट बहुमत होते. मात्र, ऐनवेळी भाजपने काही सदस्यांना आपल्या गोटात खेचत सत्तांतर घडवून आणले. या अचानक बदलामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. शिवसेना शिंदे गटाच्या दोन सदस्यांना मतदानापासून जाणीवपूर्वक रोखल्याचा आरोप करण्यात आला, ज्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले.
या गोंधळादरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे वातावरण आणखी तणावपूर्ण झाले. देसाई यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत, पोलीस प्रशासनाने निष्पक्षपणे काम न केल्याचे म्हटले. मंत्र्यांनाच धक्काबुक्की होत असेल तर सामान्य नागरिकांचा विश्वास कुठे राहील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या घटनेचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. शिवसेना नेत्यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
SP दोशी सक्तीच्या रजेवर, नवी जबाबदारी कडुकरांकडे
चौकशी पूर्ण होईपर्यंत तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखपदाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.