
मुंबई : महाराष्ट्रातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असलेल्या समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुढील काही दिवस या महामार्गावर टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गावर 9 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत एकूण 9 दिवस वाहतूक अंशतः आणि टप्प्याटप्प्याने बंद राहणार आहे. या कालावधीत विविध टप्प्यांत वाहतूक थांबवण्यात येणार असल्याने वाहनचालकांना विलंबाचा सामना करावा लागू शकतो.
समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी एकूण 21 टप्प्यांत वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे काम एमएसआरडीसी (MSRDC) मार्फत करण्यात येणार आहे.
नागपूरकडून येणाऱ्या मार्गावर किमी 300 ते किमी 365 या दरम्यान गॅन्ट्री उभारणीचे काम होणार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तसेच जालना तालुक्यातील काही भाग यांचा समावेश आहे.
प्रत्येक टप्प्यात संबंधित वाहिनीवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात वाहनांची रांग आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, प्रवासासाठी अतिरिक्त वेळ गृहीत धरावा, तसेच प्रशासन व वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन एमएसआरडीसी आणि वाहतूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे असे एकूण 10 जिल्हे थेट जोडले गेले आहेत. त्यामुळे हा महामार्ग राज्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि वेगवान प्रवासाचा दुवा ठरला आहे.
मात्र आगामी काही दिवस देखभाल आणि विकासकामांमुळे प्रवासात अडथळे येऊ शकतात, त्यामुळे वाहनचालकांनी आधीच योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे.