
Pune : पुण्यातल्या एका तरुणीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एफसी रोडवरच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या या तरुणीचा पर्सनल डेटा, तिथल्याच एका कर्मचाऱ्याने चोरला आणि तिला त्रास द्यायला सुरुवात केली. या घटनेमुळे रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या QR-कोड मेन्यू आणि ग्राहकांच्या प्रायव्हसीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
ऋषिका दत्ता असं या तरुणीचं नाव असून, तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून हा सगळा प्रकार सांगितला आहे. तिच्या पोस्टनुसार, ती २८ एप्रिल रोजी या रेस्टॉरंटमध्ये गेली होती. तिथे तिने डिजिटल मेन्यू पाहण्यासाठी एक QR कोड स्कॅन केला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी तिला एका अनोळखी नंबरवरून मेसेज येऊ लागले.
दत्ताने जेव्हा या नंबरची माहिती काढली, तेव्हा तिला कळालं की मेसेज करणारा व्यक्ती त्याच रेस्टॉरंटमध्ये काम करतो. तिला भीती वाटली की तिचा फोन नंबर रेस्टॉरंटच्या QR-कोड सिस्टीममधूनच घेतला गेला असावा. तिने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तो कर्मचारी तिच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न करत होता आणि काही खासगी प्रश्न विचारत होता, असं दिसतंय.
या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या दत्ताने रेस्टॉरंट मॅनेजमेंटकडे याची तक्रार केली. तिने सांगितलं की, तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच, रेस्टॉरंटने तिला कळवलं की त्या कर्मचाऱ्याला सर्व ठिकाणांहून कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. पण, तिने असाही दावा केला की मॅनेजमेंटने याबद्दल कोणतीही लेखी माफी मागितली नाही किंवा त्याला कामावरून काढल्याचा कोणताही लेखी पुरावा दिला नाही.
या आरोपांवर उत्तर देताना, रेस्टॉरंटने सोशल मीडियावर एक सार्वजनिक पोस्ट केली. यात त्यांनी या घटनेबद्दल माफी मागितली आणि 'तात्काळ कारवाई' केली असल्याचं सांगितलं. ग्राहकांची सुरक्षा आणि प्रायव्हसी किती महत्त्वाची आहे, यावरही त्यांनी भर दिला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अंतर्गत प्रक्रिया सुधारण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
सोशल मीडियावर अनेक युझर्सनी QR-कोड मेन्यूवर वाढत्या अवलंबनावर टीका केली आणि सुरक्षितता व प्रायव्हसीबद्दल चिंता व्यक्त केली. एका युझरने विचारलं की, 'या डिजिटायझेशनच्या नादात प्रायव्हसीचं काय? अनेकदा आधारशी लिंक असलेले फोन नंबर देण्यास ग्राहकांना का भाग पाडलं जातंय?'
दुसऱ्या एका युझरने सांगितलं की, 'ज्या रेस्टॉरंटमध्ये कागदी मेन्यू मिळत नाही, तिथे मी जाणंच बंद केलं आहे. डिजिटल होण्याचा हा अट्टाहास अनावश्यक आणि त्रासदायक आहे.'
तिसऱ्या एका युझरने तर तिच्यासोबत काही वर्षांपूर्वी नवी मुंबईतील एका मॉलमधल्या रेस्टॉरंटमध्ये असाच प्रकार घडल्याचं सांगितलं. तिने अधिकृत तक्रार करूनही तिचा छळ झाल्याचा आरोप केला. अखेर तिने त्या ठिकाणी जाणं बंद केलं. अशा परिस्थितीत महिलांना सुरक्षित वाटत नाही, असंही तिने पुढे म्हटलं.