
Pawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा आज (20 जून) निकाल लागला आहे. या निकालानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली महत्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरेंच्या उबाठा गटासोबत बंडखोरी केल्यानंतर ओमराजेंचे नाव चर्चेत आले होते. याशिवाय ओमराजे शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अशातच ओमराजेंनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
उबाठामधील सहा खासदार फुटल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठे खिंडार पडले गेले. याच फुटलेल्या खादरांपैकी एक ओमराजे निंबाळकर आहेत. पण शिंदे गटात प्रवेश करण्याचा ओमराजेंचा निर्णय हा पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणातील निकालानंतर कळणार होता. मात्र पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येमधील सर्व दोषींची निर्षोद मुक्तता करण्याचा निर्णय कोर्टाने सुनावला आहे.
यानंतर आता ओमराजे निंबाळकरांनी निकालावर नाराजी व्यक्त केली. पत्रकारांशी बोलताना ओमराजे यांनी म्हटले की, "शिंदे गटात जाण्याचा अद्याप मी निर्णय घेतलेला नाही. याबद्दल मतदार संघात जाऊन कार्यकर्त्यांशी बातचीत केल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करेन" याशिवाय शिंदे गटात प्रवेश आणि पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा निकाल याचा परस्पर काहीही संबंध नाही असेही ओमराजेंनी म्हटले.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आलेल्या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे. जवजवळ तब्बल 20 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर आलेल्या या निकालाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ओमराजेंनी निकालावर प्रतिक्रिया देत म्हटले "यापेक्षा न्यायव्यवस्थेचे मोठे दुर्दैव असू शकत नाही. राजकीय वैमनस्य असल्याचे न्यायालयाने मान्य केले, मात्र सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. त्यामुळे नेमकी हत्या कोणी केली, हा प्रश्न उपस्थित होतो,"
हत्येप्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात काही त्रुटी होत्या. म्हणून उच्च न्यायालयात धाव घेत तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती असे ओमराजे निंबाळकर म्हणाले. सीबीआयने प्रकरणात तपास केला तरीही त्या प्रक्रियेसाठी अनेक वर्षे लागली. पण आता उच्च न्यायालयातून तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा ओमराजेंनी व्यक्त केली आहे.
या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात सीबीआयकडून वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्याच्या शक्यतेवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.