
Mumbai : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्षधन सकपाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काही मंत्र्यांचे कथित संबंध आणि आक्षेपार्ह व्हिडिओ समोर येत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की, अशोक खरात प्रकरणात काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे आरोप समोर येत आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांशी संबंधित व्यक्तींशी सत्ताधाऱ्यांचे संबंध असल्याची बाब अत्यंत लज्जास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा वाद अधिक चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही सपकाळ यांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांशी तुलना करणे चुकीचे असून त्यांनी ते विधान मागे घ्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले. मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचा गैरवापर झाल्याचा आरोप करत त्यांनी चौकशीची मागणी केली. तसेच सरकार लहान प्रकरणांवर कारवाई करून मोठ्या प्रकरणांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या सर्व घडामोडींमुळे सत्ताधारी पक्षात अंतर्गत मतभेद वाढल्याची चर्चा आहे. काही नेत्यांमधील वाद आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे सरकारची प्रतिमा धोक्यात येत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.