Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने २८ सप्टेंबरला महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
मुंबई: राज्यातील नागरिकांसाठी हवामान विभागाकडून महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24 तासांत म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचा जोर लक्षात घेता राज्यातील काही जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
27
कोकणात मुसळधार पावसाचा कहर, रेड अलर्ट जारी
पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी Red Alert देण्यात आला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथेही जोरदार पावसाची शक्यता असून, Orange Alert लागू करण्यात आला आहे.
37
पश्चिम महाराष्ट्रातही सतर्कता आवश्यक
पुणे घाटमाथा परिसरात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, येथे देखील Red Alert जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर व सातारा घाटमाथा येथे Orange Alert, तर पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना Yellow Alert देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे अति मुसळधार पावसाचा इशारा असून Orange Alert जारी केला आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. यासाठी या जिल्ह्यांना Yellow Alert देण्यात आला आहे.
57
उत्तर महाराष्ट्रात वीजांपासून धोका, नाशिकसह 5 जिल्ह्यांना अलर्ट
धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. नाशिक घाटमाथा परिसरासाठी Red Alert, तर उर्वरित जिल्ह्यांसाठी Orange आणि Yellow Alert लागू करण्यात आले आहेत.
67
विदर्भातही पावसाची जोरदार शक्यता
अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून, उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासोबत वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी Yellow Alert लागू आहे.
77
हवामान विभागाचा नागरिकांना इशारा
राज्यातील अनेक भागांमध्ये आधीच पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित स्थळी राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.