
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणणारे 8 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आरोग्यसेवा सक्षमीकरणापासून ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय. यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेतून मिळणाऱ्या निधीचा वापर उपचारासाठी करण्यास मान्यता.
१९६.१५ किमी लांबीच्या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी ४९१ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च मंजूर. या निर्णयामुळे विदर्भात रेल्वेसेवा अधिक वेगवान व सोयीस्कर होणार.
अकोल्यात शहर बस स्थानक, भाजी बाजार, आणि वाणिज्य संकुल उभारण्यासाठी २४,५७९.८२ चौ.मी. जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास मान्यता.
सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथे महिला विडी कामगार सहकारी संस्थेने बांधलेल्या घरांवर मुद्रांक व नोंदणी शुल्कात सवलत देण्याचा निर्णय.
आचोळे (ता. वसई, जि. पालघर) येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी आवश्यक जमीन वसई-विरार महानगरपालिकेला देण्यास मान्यता.
नाशिक रोड येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेस मौजे देवळाली येथे १०५५.२५ चौ.मी. जमीन देण्यास सरकारची मंजुरी.
घाटकोपरमधील फलक दुर्घटनेच्या चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीचा अहवाल शिफारशींसह स्वीकारण्यात आला. संबंधित विभागांना एक महिन्यात कार्यवाही करण्याचे आदेश.
मुंबईतील अंधेरी (एसव्हीपी नगर) येथील १२२ गृहनिर्माण संस्था व ३०७ वैयक्तिक भूखंडांवरील ४,९७३ सदनिकांचा पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून राबवण्यात येणार.
या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय आरोग्य, पायाभूत सुविधा, महिलांचे सक्षमीकरण, शहरी विकास व साहित्य क्षेत्राच्या प्रगतीसाठी दिशा ठरवणारे ठरले आहेत. यामुळे राज्यातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा व संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.