एकजुटीने मैदानात उतरलो तर विधानसभेत महायुतीचा भगवा : देवेंद्र फडणवीस

पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरण्याची गरज आहे. आपण एकजुटीने मैदानात उतरलो तर विधानसभेत महायुतीचा भगवा रोवल्याशिवाय आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : Aug 3, 2024 1:36 PM IST

Devendra Fadnavis : राज्यात आज पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आजचा दिवस तुम्ही लिहून घ्या, आपण जर एकजुटीने मैदानात उतरलो तर या विधानसभेत महायुतीचा भगवा रोवल्याशिवाय आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. कारण जनतेला पुन्हा एकदा हे लक्षात आला आहे की, खरे कोण आहे आणि खोटे कोण आहेत. जनता आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे या खोट्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पुन्हा आपल्याला मैदानात उतरावे लागेल. गेली तीन महिने तुम्ही घरी होता, आता पुढची तीन महिने मला द्या, पुन्हा एकदा मी तुम्हाला राज्यात तुमची सत्ता देतो, असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

'पुन्हा एकदा सरकार आणून दाखणार' : देवेंद्र फडणवीस

ज्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने जिंकण्याची उर्मी आहे आणि पुन्हा एकदा आपण पूर्ण ताकतीने जर का मैदानात उतरलो, तसेच तुमच्या सारखे मावळे जर आमच्या सोबत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तुमचे सरकार मी आणून दाखवेलच, असे थेट आश्वासनच देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना बोलताना दिलंय. ते अमरावती येथे बोलत होते.

'तुम्ही सत्ता उपभोगली तेव्हा तुम्हाला शेतकरी, कष्टकरी आठवला नाही का?'

विरोधी पक्षातील लोक सत्तेत आले तर केवळ पैसा जमा करतात. मात्र सत्ता गेली की यांना गरीब, शेतकरी, कष्टकरी आठवतो. तर माझा यांना सवाल आहे की, गेली 60-70 वर्ष तुम्ही राज्यात सत्ता उपभोगली. यावेळी तुम्हाला शेतकरी, कष्टकरी का आठवला नाही? तुम्हाला शेतमजूर, गरीब का आठवला नाही? तुम्हाला एससी, एसटी समाज का आठवले नाहीत? सत्तेवरून गेले की या सर्वांची आठवण होते आणि सत्तेवर हे लोक आले की तोंड मिटून ते गप्प बसतात. कारण सत्तेवर आले की तात्काळ स्वतःची घरभरणं, आपल्या तिजोऱ्या भरणं, वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे करत जनतेची लूट करणं, हेच यांना ठाऊक आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच यांचे सूत्र आहे आणि हीच त्यांची मानसिकता असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

'आपण पूर्ण ताकतीने मैदानात उतरल्यास यश दूर नाही'

आपल्या सोबत एक अपघात झालाय. खिंडीत एकदाच कोणाला गाठता येतं. मात्र आता चिंता करू नका, कारण मला विश्वास आहे की आपण पूर्ण ताकतीने मैदानात उतरल्यास यश आपल्यापासून दूर नाही. मग तो अमरावती जिल्हा असो की, वर्धा असो, या संपूर्ण महाराष्ट्र. राज्यातील सर्व जागा महायुती जिंकू शकते, अशा प्रकारची हवा आज राज्यात आहे. केवळ तुमच्या मनाचा निर्धार आणि जिंकण्याची उर्मी तुमच्यात पाहिजे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Share this article