
Weather Update : देशात अधिकृतपणे मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच अनेक राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारत, पश्चिम भारत आणि दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांनी थैमान घातले आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांत ताशी 90 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
देशात अजून अधिकृतपणे मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला नसला तरी अनेक राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील वातावरणात अचानक बदल झाला असून उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांतही पावसाचा प्रभाव दिसून येणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या भागांत काही ठिकाणी गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वारे वाहू शकतात.
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या अतिमुसळधार पावसाने आणि चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये तब्बल 31 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक भागांत झाडे उन्मळून पडली, घरांचे नुकसान झाले आणि वीजपुरवठाही खंडित झाला.वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.विशेषतः कोकण, घाटमाथा आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वेगवान वारे वाहू शकतात. काही भागांत ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 8 ते 24 तास अनेक राज्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः वीजांच्या कडकडाटावेळी उघड्या मैदानात किंवा झाडाखाली थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य भागांमध्ये आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे.मान्सून दक्षिण भारतात सक्रिय होत असून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा देशात सरासरीपेक्षा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या मते, उत्तर भारतात सक्रिय झालेल्या नवीन पश्चिमी प्रणालीमुळे जम्मू-काश्मीरपासून उत्तराखंडपर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.5 जूनपर्यंत पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशात पाऊस, गारपीट आणि ताशी 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
यंदा मॉन्सून थोडा उशिरा दाखल होताना दिसत असला तरी देशातील अनेक भागांत पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मॉन्सून देशभर सक्रिय झाल्यानंतर पावसाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासूनच पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये प्रशासन सतर्क झाले असून आपत्कालीन यंत्रणांना तयार ठेवण्यात आले आहे.
वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. हवामान खात्याने दिलेल्या सूचनांनुसार:
प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज ठेवले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामासाठी जमिनीत ओलावा निर्माण होत आहे. मात्र अतिवृष्टी, वादळी वारे आणि गारपिटीचा धोका कायम असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.काही भागांमध्ये आधीच पिकांचे नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करण्याचा सल्ला दिला आहे.