
अमरावती: लग्नाच्या आदल्या दिवशी घरात आनंदाचे वातावरण असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव मोहोड अचानक बेपत्ता झाला आहे. ही घटना घडली आहे अमरावती जिल्ह्यात, आणि त्यामुळे मोहोड कुटुंबासह संपूर्ण परिसरात चिंता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
30 वर्षीय वैभव मोहोड याचं लग्न 14 मे रोजी होणार होतं. मात्र, 13 मे रोजी सकाळी "सामान आणायला जातो" असं सांगून तो घराबाहेर पडला आणि त्यानंतर तो परतलाच नाही. बराच वेळ वाट पाहूनही तो घरी न आल्याने त्याचे वडील, काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली आहे.
पोलिस तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे – वैभवने सकाळी घरातून बाहेर पडल्यावर जवळच्या एटीएममधून ₹40,000 रोख रक्कम काढली. ही माहिती पोलिसांनी तपासादरम्यान मिळवली असून, त्याच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
वैभव मोहोड हे काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचे पुत्र आहेत. ते शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांचे वडील हरिभाऊ मोहोड हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत. त्यांचा काँग्रेस पक्षात ठसा आहे आणि यशोमती ठाकूर यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.
फ्रेजरपुरा पोलिसांनी बेपत्ता प्रकरणाची नोंद घेतली असून, वैभवचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. वैभव कशामुळे बेपत्ता झाला, यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कुणाचा दबाव, मानसिक ताण किंवा काही वेगळं कारण? – याचा तपास आता पोलिस करत आहेत.
वैभवच्या बेपत्तेच्या बातमीने लग्नाची तयारी करणाऱ्या घरात आक्रोश माजला आहे. नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकरी सुद्धा या घटनेने हादरले आहेत. एक दिवसानंतर वैभवचा विवाह होणार होता, आणि अशा वेळेस त्याचं गायब होणं ही फक्त कौटुंबिक नाही, तर सामाजिक धक्कादायक घटना ठरत आहे.
ही घटना केवळ एका तरुणाच्या बेपत्तेमुळेच नव्हे, तर राजकीय स्तरावरही महत्त्वाची ठरत आहे. पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू असून, पुढील काही तास या प्रकरणात निर्णायक ठरू शकतात.